शबनम न्युज | मुंबई
शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यास सुरुवात झाली असून, या मेळाव्यात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या मेळाव्यात भाषण करताना, ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिवसेना सर्वसामान्यांची आहे याचं मी एक उदाहरण आहे. मी गेल्या दोन महिन्यांत राज्यातल्या १८ जिल्ह्यांत फिरून आलो. रोज अनेक वल्गना केल्या जातात. पण जनतेप्रती सरकारची संवेदनशीलता हरवली आहे.
पुढे ते म्हणाले, मी संभाजीनगरात सांगितलं होतं की भाड्यानं एकही गाडी लावणार नाही आणि भाड्याचा एकही माणूस आणणार नाही. बाकी ठिकाणी ५ हजार बस लावण्यात आल्या. इथे माजी परिवहनमंत्री आहेत, त्यांना राज्यात किती बसेस हे चांगलं माहिती आहे.
गेल्या ७०-८० दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात पावणेचारशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रडवणारं सरकार राज्यात आहे. मुख्यमंत्र्यांच्या आमदारांच्या अंगात सत्तेची मस्ती चढली आहे. मुंबईचा बोरीवलीतील सुर्वे नावाचा आमदार सांगतो की मी तुला जामीन देतो, कुणाचेही हातपाय तोड. संतोष बांगरनं मध्यान्न भोजन अधिकाऱ्याला मारहाण केली. कुणावरही कारवाई झाली नाही. समोरचे लोक म्हणतात माझ्याकडे ५० खोके, ५० आमदार, गुवाहाटी, सूरत आहे. पण मी सांगेन, माझ्याकडे उद्धव ठाकरे आहेत. यांच्या बळावर तुम्हाला नेस्तनाबूत केल्याशिवाय शिवसेना राहणार नाही, असेही वक्तव्य दानवेंनी शिंदे गटावर निशाणा साधत केले आहे.