शबनम न्युज | मुंबई
आज शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात दसरा मेळावा होत आहे. या दसरा मेळाव्यात दोन्ही गटातील नेते एकमेकांवर निशाणा साधत, टीका करत आहे. दरम्यान शिंदे गटातील मेळाव्यात भाषण करताना, आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
ते म्हणाले, ‘शिवसेनेने भाजपसोबत निवडणूक लढवली होती. सगळीकडे भाजसोबत मते मागितली, लोकांनीही आम्हाला भरभरुन मतदान केले. पण, निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसले. ज्या शरद पवारांवर आणि सोनिया गांधींवर बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर टीका केली, त्या शरद पवारांसोबत आणि सोनिया गांधींसोबत तुम्ही आघाडी केली. बाळासाहेबांच्या कुंटुबातील असल्यामुळे आम्ही आजही तुमचा आदर करू. पण, एखाद्या मेलेल्या कुत्र्याला जस फरपटत नेऊन कचऱ्यात फेकतात, तसचं तुम्ही आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत नेले. हे आम्ही कधीही विसरू शकत नाही,’ असे शहाजीबापू म्हणाले.