शबनम न्युज | मुंबई
“शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत नाहक वक्तव्य केलेली आहे. त्यांच्या वक्तव्याचा मी जाहीरपणाने धिक्कार करतो, संजय राऊतांनी जर अशी विधाने थांबवली नाही, तर आमची दोन हात करण्याची ही तयारी आहे”, असा इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांना दिला आहे.
संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारला षंड असं संबोधल्याच्या मुद्द्यावर शंभूराजे चांगलेच संतापले. ते म्हणाले, “आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्याबाबत वेडंवाकडं बोलणं थांबवलं नाही, तर जशाच्या तसं उत्तर शिंदे साहेबांचे सैनिक त्यांना दिल्या शिवाय राहणार नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलणं थांबवावं, आमचे मंत्रीपद, नेतेपद राहिली बाजूला पण शिंदे साहेबांबद्दल पुन्हा खालच्या पातळीवर जाऊन संजय राऊत बोलले, तर त्यांच्याशी दोन हात करण्याची आमची पण तयारी आहे.”
“सीमावादावर केंद्रानं लक्ष द्यावं. दोन्ही राज्यांमध्ये समन्वय साधून महाराष्ट्राची बाजू कशी भक्कम आहे हे सांगण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेळोवेळी करत आहेत. असं असताना षंड हा शब्द संजय राऊत यांनी आमच्या सरकारवर आणि आमच्यासाठी वापरला. संजय राऊत स्वत: कोण आहेत हे त्यांनी एकदा तपासून पाहावं. कारण ज्यांना १५ दिवसांपूर्वी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचं समन्स कर्नाटकच्या कोर्टानं धाडलं ते सुद्धा पूर्ण करण्याचं धाडस राऊतांकडे नाही. न्यायालयाचं कवच असताना सुद्धा ते तिथं जात नाहीत अशांनी आम्हाला षंड बोलू नये”, असं शंभूराज देसाई म्हणाले.