शबनम न्युज | चिंचवड
“या निवडणुकीत सहानुभूतीचा विषय नाही. मुंबईची निवडणूक सोडली तर इतर तीन ठिकाणी (पंढरपूर, कोल्हापूर आणि देगलूर) भाजपची सहानुभूती कुठे गेली होती? त्यावेळी त्यांना सहानुभूती दिसली नाही का,” असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेरगाव मध्ये माध्यमांशी बोलताना केला. आज चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवट दिवस असतानाच, महाविकास आघाडी वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनतर अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, “पोटनिवडणुकीत चिंचवड जागेसाठी आणि उमेदवार कोण यासाठी मी शेवटपर्यंत चर्चा केली. वेगवेगळे पर्याय दिले पण एकमत झाले नाही. सकाळी सर्वांशी बोललो. त्यानंतर नाना काटे यांच्या नावावर एकमत झाले. ते जाहीर केले. राहुल कलाटे उभे राहणार असले तरी आमचा अजूनही एकमत करण्याचा प्रयत्न आहे. सहानुभूतीचा विषय नाही. तीन निवडणुकामध्ये यांना सहानुभूती दिसली नाही. फक्त मुंबईमध्ये त्यांनी उमेदवार दिला नाही. त्यामुळे ही निवडणूक लढवावी हे सर्वांचे मत होते. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा पाठिंबा राहील असे सांगितले आहे. या शहराशी माझा संबंध आहे. माझी राजकीय सुरुवात येथून झाली. त्यावेळी मी देशात पहिल्या क्रमांकाची मते घेतली होती. या शहराचा कायापालट केला. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे.” असेही ते म्हणाले.