शबनम न्युज | दिल्ली (वृत्तसंस्था)
भारतीयांनी आपल्या लोकशाहीला संसदेची नवी इमारत भेट म्हणून दिली आहे. संसद भवन परिसरात सर्वधर्मीय प्रार्थना झाल्या. नव्या संसदेच्या लोकार्पणानंतर सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो. नवी संसद हे १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. नवी संसद हे विश्वाला भारताच्या दृढसंकल्पाचा संदेश देणारे मंदिर आहे. नवीन संसद भवन आपल्या संकल्पांना सिद्धीशी जोडणारा दुवा सिद्ध होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवे संसद भवनाचे उदघाटन करण्यात आले. तेव्हा ते बोलत होते.
या भव्य सोहळ्यात हवन-पूजा करण्यात आली. तसेच सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्याहस्ते या नव्या वास्तूचे लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवीन संसदेत प्रवेश करण्यापूर्वी विधीवत पूजन-हवन केले. तामिळनाडूतील अध्यानम संतांनी वैदिक मंत्रोच्चार केला. लोकसभा सभागृहात बसवल्या जाणाऱ्या सेंगोलचे पूजन केले. यानंतर नवीन संसदेत पंतप्रधान मोदी यांनी संबोधन केले.
पंचायत भवनापासून संसद भवनापर्यंत, आपल्या देशाचा आणि तेथील लोकांचा विकास ही आपली प्रेरणा आहे. नवीन संसदेच्या उभारणीचा आपल्याला जसा अभिमान वाटतो, तसेच गेल्या ९ वर्षांत देशात ४ कोटी गरीब लोकांसाठी घरे आणि ११ कोटी शौचालये बांधल्याचा विचार करताना मला खूप समाधान मिळते. भारत ही लोकशाहीची जननी आहे. जागतिक लोकशाहीचाही तो पाया आहे. लोकशाही हे आपले संस्कार, कल्पना आणि परंपरा आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.