‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची निर्मिती
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
पिंपरी – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड येथील सेंट्रल चौकातील आणि मुंबई-बंगळुरु महामार्गावरील वाकड, भूमकर चौक, पुनावळे, ताथवडेतील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. किवळे जंक्शन ते बालेवाडी स्टेडिएमपर्यंत 8.6 किलोमीटर अंतरावर ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याबाबतचा डीपीआर तयार असून यासाठी आवश्यक जागेचे महापालिकेने तातडीने भूसंपादन करण्याची सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून जाणा-या मुंबई-बंगळुरु महामार्गावरील वाकड, भूमकर चौकातील आणि देहूरोड येथील वाहतूक कोंडी सोडविणे आणि भविष्यकालीन नियोजनाबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्यामार्फत सादरीकरण महापालिकेत सादरीकरण करण्यात आले. आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रेरणा शिनकर, उपव्यवस्थापक अंकित यादव, सल्लागार भरत तोडकरी, ऋषीकेश कुमार आदी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, वाकड, ताथवडे, पुनावळे हा भाग नव्याने विकसित होत आहे. मोठ मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या उभारल्या जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत वाढत आहे. भविष्यातही वाहतुकीची समस्या निर्माण होईल. त्यासाठी आत्तापासूनच नियोजन केले जात आहे. त्यासाठी किवळे जंक्शन ते बालेवाडी स्टेडिएमपर्यंत 8.6 किलोमीटर अंतरावर ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची निमिर्ती करण्यात येणार आहे. त्याबाबतचा आराखडा तयार केला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वरुन चार आणि खालच्या बाजुने चार लेन असणार आहेत. देहूरोड, किवळे, रावेत, पुनावळे, ताथवडे, भूमकर, चौक आणि वाकडमधील वाहतूक कोंडी सुटणार आहे.भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार आहे.
महापालिकेने आत्तापर्यंत 35 टक्के जागेचे भूसंपादन केले आहे. पूर्ण जागेचे तातडीने भूसंपादन करावे. जेणेकरून काम लवकर सुरू होईल. वाकड चौकात दोन मजली ब्रीज उभारला जाणार आहे. मुळा नदीवरील पुलाच्या उजव्या बाजुला तीन लेन वाढविल्या जाणार आहेत. मुठा नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजुला तीन लेन वाढविल्या जाणार आहेत. किवळे चौक, समीर लॉन, पुनावळे, ताथवडे, भूमकर चौक आणि वाकड चौकातील अंडरपासमध्ये सुधारणा केली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटेल असा विश्वास खासदार बारणे यांनी केली.