(लेखिका – सिमरन सय्यद)
कोरोना हा एक प्रकारचा विषाणू आहे. संपूर्ण जगच त्याच्या विळख्यात सापडले आहे. परंतु खूप परिश्रमानंतर त्यावर आता लस शोधण्यात आलेली आहे. कोरोना नावाचा विषाणूंचा गट आहे. त्याचा संसर्ग झाल्यास होणाऱ्या आजारास कोविड-19 असे नाव दिलेले आहे. 2019 मध्ये हा रोग मनुष्यात आढळल्याने कोरोना व्हायरस 19 म्हणजेच कोविड-19 (Covid 19) असे नाव देण्यात आले. 2019 मध्ये चीनच्या वुहान या शहरात कोरोना विषाणू संक्रमण आढळून आले. सुरुवातीला वुहानमध्ये पसरलेला हा आजार संपूर्ण चीनमध्ये पसरला आणि त्यांनतर संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान मांडले आहे.कोरोना विषाणूच्या रोगामुळे कित्येक जण मृत्यू पावले आहेत. आणि कित्येक जण या आजाराला लढा देत आहे. कोरोना विषाणूचे रुग्ण हे झपाट्याने वाढत आहेत. आणि या विषाणूला रोखण्यासाठी सरकारने आता लॉकडाऊन जाहीर केलेले आहे. सर्वत्र कडक निर्बंध लावले गेलेले आहे. अत्यावश्यक वस्तू वगळता सर्वच बंद आहे. कोरोना व्हायरस च्या उद्रेकामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी आता लस उपलब्ध झाली आहे. परंतु तरीही कोरोना विषाणूचे रुग्ण हे कमी होत नाही,कारण लस प्रत्येक व्यक्तीला दिली गेलेली नाही. कोरोनावर मात करणारी लस हि सर्वांनाच मिळाली पाहिजे, परंतु वयानुसार टप्प्या टप्प्याने हि लस दिली जात आहे तर कुठे लसी चा साठा कमी पडत आहे. अशा परिस्थितीत कोरोनावर मात करणे कठीण झाले आहे.
कोरोना काळात संपूर्ण जगभरात माणसांचे राहणीमान बदलले. खूप सारे लोक घरी बसून असल्याने विविध कला आणि मनोरंजन तसेच व्यायाम, योगा शिकण्यात व्यस्त करत आहेत. स्वयंरोजगार ही संकल्पना खूप लोकांनी अंगिकारली. या कोरोना काळात पोलिस आणि डॉक्टर्स यांचा सहभाग आणि सहयोग हा खूपच बहुमूल्य आहे.
तसेच कोविड-१९ चा उच्च शिक्षणावर दूरगामी परिणाम झाला आहे. इंजिनिअरिंग व आर्किटेक्चरसाठी प्रवेश परीक्षेस उशीर झालेला आहे. प्रवेश परीक्षा न झाल्यास किंवा त्यास विलंब झाल्यास विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि या संदर्भात शासकीय निर्णयांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहेत. तसेच, नोकरी गमावणे, वेतन कपात, टाळेबंदी, सेक्टर बंद होणे याचा देय क्षमतेवर परिणाम झाला आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पास करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष देणं कमी केलं आहे. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यात शाळा,महाविद्यालय बंद आहे,आणि ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. परंतु तरीही विद्यार्थ्यांचे शिक्षण क्षेत्रात नुकसान झालेले आहे.
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक लॉकडाऊन लावले. या लॉकडाउनचा अनेक व्यवसायांवर परिणाम झालेला आहे. अनेक व्यवसाय बंद पडले. बेरोजगारी वाढली, गोरगरीब कुटुंबातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. सध्यातरी या कोविड -19 विषाणूची साखळी तोडण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
या लेखाच्या माध्यमातून मी आवाहन करते कि, सध्या कोरोना विषाणूचे भयानक असे वातावरण झालेले आहे. या कोरोना काळात सर्वांनी एकजुटीने कोरोनावर मात कसा करावा याचा विचार करायला हवा. शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करणे हवे आहे. मास्क आणि सॅनिटायझर चा वापर करायला हवा आहे. सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे आहे.