मुंबई दि. ७ जून – जिथे भाजप तिथे मृतांचे आकडे लपवण्याचा खेळ सुरू आहे. आमचा कारभार पारदर्शक आहे भाजपसारखे आकडे लपवण्याचे काम आम्ही करत नाही असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.
राज्यात कोरोनाने एक लाखापर्यंत मृतांचा आकडा पोचला असून भाजप महाविकास आघाडी सरकारचे पाप असल्याचे बोलत असून याला नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पहिल्या दिवसापासून कोरोना रुग्णांची नोंद केंद्रसरकारच्या नियमानुसार पारदर्शकपणे करण्यात आली आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य एकमेव आहे जिथे मृतांच्या आकड्यांची नोंद पारदर्शकपणे झाल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.
आम्ही कुठलेही आकडे लपवलेले नाही. जी परिस्थिती आहे ती जनतेसमोर ठेवली आहे. ७० हजार दरदिवशी केसेस येत असताना राज्यात हॉस्पिटलमध्ये जागा नाही किंवा ऑक्सिजन मिळाला नाही अशा बातम्या आल्या नाहीत. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात महाराष्ट्र व मुंबई मॉडेल जगभर प्रसिद्ध झाले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
४ लाख लोकांच्या मृत्यूचा आकडा देशात दिसत आहे. परंतु पत्रकार आणि शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून हा आकडा दहापट म्हणजे ४० लाखाच्या घरात जात आहे ही वस्तुस्थिती आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
एकट्या उत्तरप्रदेशमध्ये ५ ते ६ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काहींचे मृतदेह अक्षरशः नदीत प्रवाहीत करण्यात आले तर काही ठिकाणी नदीकिनारी भगव्या वस्त्राच्या कफनात लपटलेले मृतदेह पडलेले पहायला मिळाले. गुजरातमध्ये आणि बिहारमध्येही मृतांचे आकडे लपवण्यात आल्याचे समोर आले आहे. भाजपला बोलण्याचा अधिकार आहे परंतु आम्ही महाराष्ट्रात भाजपसारखे मृतांचे आकडे लपवले नाहीत असेही नवाब मलिक यांनी ठणकावून सांगितले आहे.