शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून या पुलाचे उद्घाटन त्वरित करावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे केली आहे. दिलेल्या पत्रात राजू मिसाळ यांनी नमूद केले आहे की, पिंपरी चिंचवड शहराच्या प्रवेशव्दारावरील निगडी येथील भक्ती शक्ती येथील उड्डाणपुलाचे काम दोन आठवड्यापूर्वी पूर्ण झालेले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या सत्ताकाळात मान्यता मिळालेल्या शहरातील महत्वकांशी प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प आहे. पुणे – मुंबईकडील वाहतुक सुरळीत होण्यासाठी त्याच प्रमाणे या चौकात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून या उड्डाणपुलाचे नियोजन करण्यात आले होते.
सदर उड्डाण पुलाचे काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे हा पूल वाहतूकीसाठी खुला करणे गरजेचे आहे. हा पूल बंद असल्यामुळे या परीसरातील नागरीकांची गैरसोय होत आहे. सदर पुलाचे काम पूर्ण झाले असूनही हा पूल बंद असल्यामुळे नागरीकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे या परीसरातील नागरीकांच्या भावना लक्षात घेऊन सदर पूल वाहतूकीसाठी त्वरीत खुला करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने भक्ती शक्ती उड्डाणपूलाचे उदघाटन पुणे जिल्हाचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब यांच्या शुभहस्ते व मा. महापौरच्या अध्यक्षतेखाली तसेच शहरातील विविध मान्यवरांच्या उपस्थित करण्याचा मानस आहे. तरी आपणांस विनंती आहे की,निगडी उड्डाणपुलाचे उदघाटन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात यावे. असे हि विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ यांनी महापौरांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.