शबनम न्यूज / मुंबई
महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. त्या तिघांनी एकत्रित राहावं याला सर्वांनीच प्राधान्य द्यावे. त्यातूनच एखाद्या पक्षाला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्रित राहतील त्यादृष्टीने ‘सामना’ ने मत व्यक्त केले आहे मात्र महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसते असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
कॉंग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केल्यावर ‘सामना’ मध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित लढतील असे छापून आल्याचा प्रश्न पत्रकारांनी जयंत पाटील यांनी केला असता त्यांनी आपले मत व्यक्त केले.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सध्या पक्षवाढीसाठी स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त करत असतील. प्रत्येक पक्षाचं बळ किती आहे हे महाराष्ट्रात सर्वांनाच माहित आहे. म्हणून तिघांनी एकत्र येऊन अधिक संघटितपणाने काम करणे अपेक्षित आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
निवडणूका जवळ आल्यावर कदाचित ते वेगळा विचार करु शकतील पण त्यांनी तसा विचार केला नाही तर मग जे समविचारी पक्ष आहेत ते एकत्रित राहतील असेही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
आता निवडणुका नाहीत त्यामुळे यावर रोज चर्चा कशाला करायची. ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी नक्कीच चर्चा करु. ज्यावेळी निवडणूका होतील त्यावेळी स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन चर्चा होईल असेही जयंत पाटील यांनी सांगितले.