शबनम न्युज / नागपूर
घरातून पळून जाऊन लग्न करण्याच्या संशयावरून पती-पत्नीने मुलीच्या प्रियकरावर कुऱ्हाडीने हल्ला करीत ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना अत्रे ले-आउट येथे शनिवारी दुपारी १ .३० वाजताच्या सुमारास घडली. युवकाने दिलेल्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून दाम्पत्याला अटक केली आहे. राजू (वय ३६) आणि त्याची पत्नी रजनी (वय ३३ दोन्ही अत्रे ले-आउट) अशी अटकेतील दाम्पत्याचे नाव आहे. आकाश वर्मा (वय २७) असे जखमीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील राजू व आकाश हे एकाच वस्तीत राहतात.
आकाश याचे राजूच्या मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत. चार दिवसांपूर्वी मुलगी बेपत्ता झाली. दाम्पत्याने शोध घेतला असता ती आढळली नाही. शेवटी तीच स्वतःहून घरी परतली. दरम्यान २५ जूनला सकाळी ११.३० वाजता मुलगी घरून पुन्हा बेपत्ता झाली. ती सोनेगाव येथे गेली. तिने आकाश याच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्याला भेटायला बोलाविले. आकाश व त्याचा मित्र सोनेगाव येथे गेले. पळून जाऊन लग्न करू, असे ती आकाश याला म्हणाली. आकाश याने तिची समजूत घातली आणि तिला मावशीकडे सोडले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मावशीकडे असल्याचे तिने आईला सांगितले. तिच्या आईने तिला घरी परत आणले. मुलगी आकाशला भेटल्याची माहिती राजूला मिळाली. त्यामुळे राजू प्रचंड संतापला.
शनिवारी दुपारी राजू व त्याची पत्नी यांनी दारू ढोसली आणि त्यानंतर दोघेही आकाशच्या घरात घुसले. राजू याच्या हातात कुऱ्हाड होती. ‘तू मुलीला का भेटला. ती मावशीकडे असल्याची माहिती आम्हाला का दिली नाही?’ असे विचारत राजू याने आकाशसोबत वाद घातला. त्यानंतर राजू याने आकाशच्या डोक्यावर कुऱ्हाडीने तीन वार केले. आकाश गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच बजाजनगर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी आकाश याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून हल्लेखोर दाम्पत्याला अटक केली