शबनम न्यूज / पिंपरी
हरित क्रांतीचे प्रणेते राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात दिलेले योगदान शेती धोरणाला चालना देणारे, बळीराजाला अधिक प्रगत करण्याच्या दृष्टीने क्रांतीकारक ठरले असल्याचे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, आयुक्त राजेश पाटील, प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, जनता संपर्क अधिकारी किरण गायवाड, विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सिताराम राठोड, रवि राठोड, दिलीप आडे, रमेश राठोड, अविनाश राठोड आदी उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे सतत शेतक-यांच्या हितासाठी प्रयत्नशील असायचे, त्यांनी गरीबांसाठी रोजगार हमी योजना सुरु केली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन वसंतराव नाईक यांनी सार्वजनिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रात मिळवलेले यश सर्वांसाठी सतत प्रेरणादायक ठरेल असेही त्या म्हणाल्या. कृषी सिंचन क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी दिवंगत नाईक यांनी केलेली कृषी क्रांती महत्वपूर्ण आहे. राज्याच्या विकासाला दिशा देण्यासाठी त्यांनी केलेली पायाभरणी मार्गदर्शक ठरत आहे असे सांगून महापौर ढोरे यांनी दिवंगत नाईक यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच कृषी दिनानिमित्त सर्वाना शुभेच्छाही दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.