पुणे येथील कार्यक्रमात रिक्षाचालक, फेरीवाले, कष्टकरी जनतेचा इशारा
शबनम न्यूज / पुणे
पुणे शहरात दीड लाख रिक्षाचालक मालक आहेत. एक लाख फेरीवाले आहेत. त्यामुळे गेली १४ महिन्यापासून व्यवसाय बंद असल्यामुळे असंघटित कामगार कष्टकरी जनतेचे अतोनात हाल सुरू आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडे वारंवार मागणी, मोर्चा आंदोलन करून प्रश्न सोडवले जात नाहीत, आमचे प्रश्न सोडवा. आमची दखल घ्या अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत सत्ते पासुन बेदखल करू असा इशारा कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला . पुणे येथे आयोजित प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
ज्येष्ठ नेते विठ्ठल गायकवाड यांच्या हस्ते महामाता रमाई आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
या वेळी घरकाम महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे कष्टकरी जनता आघाडी अध्यक्ष अनिताताई सावळे महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष शफिक पटेल, उपाध्यक्ष अरशद अन्सारी, टपरी पथारी हातगाडी पंचायत प्रदेश सचिव प्रल्हाद कांबळे, पुणे शहराध्यक्ष राजाभाऊ टोपे, रमेश सगट, नवनाथ कोनसे, फिरोज शेख कष्टकरी जनता महिला आघाडीच्या सौ.शमिम शेख, रोहिणी, आयेशा अन्सारी तसेच जिल्हा अध्यक्ष अलिभाई शेख आदी उपस्थित होते.
यावेळी बाबा कांबळे म्हणाले रिक्षाचालकांना फायनान्स कंपनी त्रास देत आहेत आम्हाला साधी मुदतवाढ दिली जात नाही मेट्रो सोबत करार केला म्हणून एक संघटना आंदोलन करत आहे यामुळे ओला उबरला फायदा मिळेल पुणे स्टेशन येथे ओला उबेरला जागा दिली तेव्हा हे का गप्प होते, तेव्हा आंदोलन का नाही केले तेव्हा आम्ही जम्मू काश्मीर रेल्वे स्टेशन सह सर्वत्र आंदोलन केले तेव्हा याच संघटनेने आम्हाला साथ नदेता विरोध केला. चुकीचा भूमिकेमुळे रिक्षा चालक यांच्या पासून दूर गेले आहेत स्वतःला पुण्यातील सर्वात मोठी संघटना म्हणण्याचा त्यांना अधिकार त्यांनी गमावला आहे, आता सर्वात मोठी संघटना म्हणून आम्हाला मान्यता मिळाली आहे. पुणे महानगरपालिकेने टपरी पथारी हातगाडी धारकांचे सर्वेक्षण केले पाहिजे. हॉकर्स झोन केले पाहिजे, अशी आमची मागणी आहे, धूणी -भांडी साफ सफाई कामगार महिला बांधकाम मजुरांच्या सर्व असंघटित कामगार कष्टकरी जनता कोरोणामुळे उद्ध्वस्त झाली आहे. त्यांच्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी आम्ही केली . परंतु निर्णय होत नाही. आपले प्रश्न सोडवण्यासाठी पुणे शहरातील रिक्षाचालक फेरीवाले कष्टकरी जनतेने एकत्र यावे असे आव्हान देखील यावेळी बाबा कांबळे यांनी केले.
कला सांस्कृतिक विभाग प्रमुख मुराद काझी, यांनी सूत्रसंचालन केले, शफिक पटेल यांनी प्रस्तावना केली. रिक्षा चालक संदीप घुले यांनी आभार मानले.