- हभप कराडकरांची मुक्तता व वारकऱ्यांच्या व्यथा समजून घ्या..
- भाजयुमोचा महाविकास आघाडी सरकारला इशारा…
शबनम न्यूज / पिंपरी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या चलपादुकांनी श्रीक्षेत्र आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. टाळ-मृदंगांचा गजर आणि हरिभक्तीत तल्लीन झालेल्या वैष्णवांच्या संगतीने २० जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी पालखी एसटीने पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.
या अनुषंगाने शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने श्री क्षेत्र आळंदी येथील हभप वै. गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे (बाबा) श्री ज्ञानेश्वरी मंदीर, गोपाळपुरा येथे भेट देऊन दर्शन घेतले.
मंदिराचे उत्तराधिकारी हभप. विष्णु महाराज केंद्रे (बाबा) यांनी मंदिरात नित्यनियमाने चालणाऱ्या पुजापाठ, किर्तन, प्रवचनाबद्दल माहिती दिली. करोना काळात विस्कळीत झालेली व्यवस्था, पालखी सोहळ्यावर शासनाचे निर्बंध आदीबद्दल त्यांनी जाहीर नाराजगी व्यक्त केली. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शिवराज सुदामराव लांडगे, भाजयुमो शहर सरचिटणीस दिनेश लालचंद यादव, अमित घुंडरे, सिध्दार्थ गावडे, पै. मृणाल काळे आदी उपस्थित होते.
दिनेश यादव म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक वर्षांची परंपरा असणा-या पालखी सोहळ्यावर जाचक नियम अटी लादले आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असतानाही पायी वारीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. मोजक्याच मानाच्या वारकऱ्यांना बसनं पंढरपुरात वारीसाठी दाखल होण्याची परवानगी दिली आहे. पायी वारी रद्द झाल्याने अनेक वारकरी वारीला जाण्याची इच्छा असूनही वारीला जाऊ शकत नाहीत. हभप बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी स्थानबध्द केले आहे. लागू केलेले निर्बंध उठवून हभप बंडातात्या कराडकर आणि इतर वारक-यांना नजरकैदेतून मुक्त करावे. शासनाने मार्गदर्शक सूचनांसह महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांना वारीला जाण्यासाठी परवानगी द्यावी अन्यथा वारीची सातशे वर्षांची परंपरा पुन्हा एकदा खंडित होईल. भाजयुमोच्या वतीने लवकरच सरकारकडे आग्रही मागणी करणार असल्याचे यादव यांनी यावेळी सांगितले.