जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण अंतर्गत जिल्हास्तरीय समितीची जिल्हास्तरीय बैठक संपन्न
शबनम न्युज / पुणे
जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण अंतर्गत जिल्हास्तरीय समितीची जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी जिल्हापातळीवर यामाध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त संगिता डावखर, सदस्य अरूण रोडे, चंद्रकांत महामुनी तसेच श्रीमती देशमुख, तसेच पोलीस अधिक्षक कार्यालय तसेच जिल्हयातील सर्व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती संगिता डावखर यांनी पुणे जिल्हयातील ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण होणे आवश्यक असुन सर्व नगरपरिषद, नगरपालिका, पंचायत समिती यांनी ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करुन सदरचा अहवाल पुढील एक महिन्यामध्ये सादर करण्याबाबतच्या सूचना केल्या. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक पातळीवर करमणुक केंद्र स्थापन करणे व जेष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी शासनामार्फत राबविण्यात येणा-या योजनांची माहिती वृध्दांना मिळणेकरिता तालुकास्तरावर शासन मान्यता संस्थेमार्फत (योजना माहिती कक्ष) ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करणेबाबत सुचना दिली.
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (NISD) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फाऊंडेशन तर्फे राष्ट्रीय हेल्प लाईन टोल फ्री क्रमांक 14567 सुरु करण्यात आला असुन जिल्हयातील ज्येष्ठ नागरिकांनी गरज भासल्यास अथवा जिल्हयातील नागरिकांना कोणतीही वृध्द व्यक्ती बेघर असल्याचे आढळल्यास त्यांना वेळेत मदत मिळावी या करिता तसेच ज्येष्ठ नागरिकांना काही करावयाची असल्यास सदर हेल्पलाईन क्रमांक 14567 यावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या वतीने सहाय्यक आयुक्त श्रीमती डावखर यांनी केले आहे.
तसेच सदरील टोल फ्री क्रमांकाची नोंद घेऊन प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने दर्शनी भागात लावण्यात यावा व ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त सदरबाबतीत माहिती होण्याच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणीही टोल फ्री क्रमांकाची प्रसिध्दी करण्यात यावी असेही आवाहन करण्यात आले आहे.