अखिल भारतीय महासंघ आणि स्त्री शक्ती मंचची आक्रमक भूमिका…
येत्या १५ दिवसात प्रश्न न सुटल्यास जनव्यापी आंदोलन – नगरसेविका शैलजाताई मोरे…
पिंपरी (दि. २२ जुलै २०२१) :- प्राधिकरणात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. काही वेळा या भागात पूर्ण दिवसभर वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढला आहे. विजेचा असहकार इतका वाढला आहे की, मोबाइल चार्ज करण्याइतकाही वीजपुरवठा या भागात होत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांच्या सहनशीलतेचा अंत होत असून, महावितरणाच्या कारभारावर ताशेरे ओढणारी वक्तव्ये या भागातील रहिवाशांकडून केली जात आहेत. याबाबत आक्रमक पवित्रा घेत नगरसेविका शैलजाताई अविनाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय महासंघ आणि स्त्री शक्ती मंचच्या सहयोगाने आज गुरुवारी (दि. २२) रोजी प्राधिकरणातील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. महावितरण अधिका-यांना यावेळी जाब विचारण्यात आला. प्रसंगी महावितरण अधिकारी चौधरी व जोडगे यांना निवेदन दिले. येत्या १५ दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत होईल, असे मौखिक आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी भाजप नगरसेविका शैलजाताई मोरे, सचिन कुलकर्णी, मनोज देशमुख, आर. एस. कुमार, प्रसेन अष्टेकर, आनंद देशमुख, नरेंद्र येलकर, शर्मिला महाजन, राधिका बोर्लीकर, रवींद्र बोर्लीकर, सागर घोरपडे, प्रशांत बोरा, ऋतुजा कुलकर्णी, मुन्ना बेग, निवेदिका कछुवा, सीमा हिमणे, अनघा शेवाळे, मारू काकू, सीमा वैष्णमपायन, आदित्य कुलकर्णी, मुजु शेख, जाकिर शेख, नितेश पवार, ऋषी टेकाळे आदी उपस्थित होते.
नगरसेविका शैलजाताई म्हणाल्या, प्राधिकरणातील प्रभाग क्रमांक १५ से. नं. २५, २६, २७, २७ अ मधील रहिवाशांची महावितरणविरोधात संतापाची भावना निर्माण झाली आहे. सध्या ऑनलाईन शाळा सुरु आहेत. १० वी, १२ वीचे प्रवेश सुरु झाले आहेत. स्पर्धा परीक्षा देणारी विद्यार्थी, अनेकांची कार्यालयांची कामे सध्या घरूनच सुरु आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचा परिणाम होत आहे. पालकही मेटाकुटीला आले आहेत. आठवड्यातून तीन ते चार दिवस विजेचा लपंडाव ठरलेलाच आहे. दिवसा आणि रात्रीच्या २४ तासांत मिळून वीजग्राहकांना केवळ आठ ते दहा तास वीज पुरवठा मिळत आहे. वीज पुरवठ्याअभावी वीजेवर आधारीत उपकरण ठप्प झाले असून, अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विजेची समस्या निकाली काढण्यासाठी वारंवार महावितरणकडे मागणीही केली; परंतु, त्याची दखल अद्यापही घेण्यात आलेली नाही. वीज जाण्याचे कारण काय? या प्रश्नाला केवळ आमचा काहीही दोष नाही, असे उत्तर महावितरणाकडून देण्यात येत आहे. विजेचा दाब कमी अधिक होतो. त्यामुळे घरातील विजेवर चालणारी उपकरणे नादुरुस्त होत आहेत. यापुढे वीजप्रवाह खंडित झाल्यास, नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊन, कायदा व सुव्यवस्थेचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील विद्युतपुरवठा १५ दिवसात सुस्थितीत आणि सुरळीत ठेवून सहकार्य करावे. अन्यथा महावितरण कार्यालयात त्रस्त रहिवास्यांना बरोबर घेऊन टाळकुटो आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेविका मोरे यांनी महावितरणास दिला आहे.