उत्तरतालिकेतील अक्षम्य गोंधळामुळे लाखो परीक्षार्थींचे भवितव्य टांगणीला
शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी | बातमीदार
काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेतील चुकीच्या उत्तरतालिकेमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असल्यामुळे या परीक्षेचा निकाल पुनर्पडताळणी केल्याशिवाय जाहीर करू नये, अशी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अॅड.चैताली पाचपुते यांनी ही याचिका दाखल केली आहे.
अॅड.पाचपुते या मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत असून त्यांना स्वतःला २०१७-१८ साली एमपीएससी परीक्षा देताना हा गोंधळ अनुभवास आला होता. त्यानंतर याचिकाकर्त्या सातत्याने एमपीएससी परीक्षेच्या पॅटर्न व संचालनावर लक्ष ठेवून होत्या. त्यांना उक्त परीक्षा आयोजित करण्याच्या पद्धतीमध्ये अस्पष्टता आणि त्रुटी आढळली. याचिकाकर्त्याना असेही आढळले आहे की एमपीएससीकडून परीक्षेपूर्वी उत्तरतालिकांची तपासणी करण्याची तसदीही घेतली जात नाही.
दरवर्षी राज्यातील लाखो विद्यार्थी डोळ्यात उज्ज्वल भविष्याचे स्वप्न घेऊन विविध पदांद्वारे प्रशासकीय कामकाजात सामील होण्यासाठी एमपीएससी परीक्षा देत असतात. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेला बसणारे विद्यार्थी पुष्कळ मेहनत घेतात. या परीक्षेत विद्यार्थ्याने सादर केलेले एक चुकीचे उत्तरदेखील नकारात्मक चिन्हांकित करण्याच्या पद्धतीखाली येते आणि प्रत्येक प्रश्नावर आपोआप १/4 गुण कमी होते. हे सर्वज्ञात आहे की अशा कठोर स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विद्यार्थी किरकोळ गुणांच्या फरकाने संधी गमावतात, कधीकधी विशिष्ट गुणांमधील गुण देखील खूप फरक करतात. या पार्श्वभूमीवर एमपीएससी पूर्व परीक्षेतील उत्तरतालिकेत दिल्या गेलेल्या चुकीच्या उत्तर पर्यायांमुळे विद्यार्थी गोंधळले जाऊन त्यांचे गुण कमी होण्याची तसेच ते अनुत्तीर्ण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे या परीक्षेस बसणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय बानू शकते, असे या याचिकेत नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर दाखल केलेल्या या याचिकेवरील अंतिम निकालापर्यंत २१ मार्च २०२१ रोजी झालेल्या एमपीएससी पूर्व परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करू नये तसेच उत्तरतालिकांची पुनर्पडताळणी आणि दुरुस्ती करण्यात यावी, अशी विनंती अॅड.चैताली पाचपुते यांनी याचिकेद्वारे केली आहे. या प्रकरणी अॅड. निरंजन भावके आणि अॅड. कमलेश वाय. माळी काम पाहत आहेत.