शबनम न्यूज | आंबेगाव
पुणे | प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे शेतीच्या बांधबंदिस्तीचे, पीकांचे, घरांचे व गोठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागाची बांधावर जाऊन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रत्यक्ष पहाणी केली. आणि नुकसानग्रस्त ग्रामस्थांशी दिलीप वळसे पाटील संवाद ही साधला.
याप्रसंगी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त भागातील नागरिकांचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच शेतकऱ्यांना वीमा काढून देण्यासाठी कृषी विभागाने मदत करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
मुसळधार पावसामुळे भीमाशंकर खोरे,पोखरी घाट तसेच आहपे खोरे डिंभे- माळीण – कुशीरे घाटांमध्ये दरड कोसळून रस्ते बंद झाले होते. सध्या एकेरी वाहतूक सुरु असून नागरिकांची गैरसोय होत असल्याने रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.