शबनम न्यूज | खटाव
सातारा | प्रतिनिधी
खटाव तालुक्यातील ‘मोळ’ येथे जोतिबा मंदिर सभामंडप व भिवाई देवी सभामंडप यांचे उद्घाटन व ‘डिस्कळ’ येथे स्मशानभूमीचे भूमिपूजन माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी मोळ व डिस्कळ भागातील जनतेशी संवाद साधला.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि, मोळ गावाने माझ्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नेहमीच विश्वास दाखवला आहे. त्यामुळे या गावातील सर्व काम करणे हे माझं कर्तव्य आहे. हा भाग दुष्काळी पट्यात येतो. मी ज्यावेळी आमदार झालो तेव्हा याठिकाणी टँकरची गरज लागत होती. पण आपण बंधाऱ्यांची आणि जलसंधारणाची इतकी कामे या विभागात केली की, आज गावाला टँकरची आवश्यकता नाही. या परिसरात तीन बंधारे बांधण्यासाठी आपण निधी दिला. जिहे कठापुरची योजना टप्पा एक आता पूर्णत्वाकडे आहे. नेर धरणात पाणी येईल वरच्या गावांना पाणी पोहचवण्यासाठी ‘एकशे तीस कोटी’ रुपयांच्या प्रस्तावाला देखील मान्यता मिळाली आहे, लवकरच त्याचे टेंडर होईल. मी कोणत्याही गावाला योजनेतून वगळा अशी भूमिका घेतलेली नाही. मात्र खटाव मधील ‘मोळ’, ‘मांजरवाडी’ सह डोंगर माथ्यावरील सर्व गावांना प्राधान्याने पाणी द्यावे, ही आमची भूमिका आहे. असेही यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
तसेच डिस्कळ गावातील ‘वैकुंठभूमी’चे भूमीपुजन आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले असून व त्याचे सुंदर डिझाईन व नेटके नियोजन ही यावेळी करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद,पंचायत समिती आपल्या राष्ट्रवादीकडे असल्यामुळे त्यामाध्यमातून सुद्धा विकासकामांचे प्रस्ताव द्या, राष्ट्रवादीच्या माध्यमातून ही कामे पूर्ण करून घेण्याची हमी मी घेतो, असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी दोन्ही गावांतील उपस्थितांना दिला.