बानगेच्या आजीने हसन मुश्रीफ यांची भर रस्त्यातच अडविली गाडी
शबनम न्यूज | बानगे
कागल | प्रतिनिधी
कागल तालुक्यातील बानगे या पूरग्रस्त गावातील पूरबाधित गल्ल्यांची पाहणी करून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गाडीतून परत असताना ग्रामदैवत श्री. अंबाबाई मंदिर समोरील चौकात येसाबाई गणपती मगदूम ही ८० वर्षाची आजी चक्क गाडीसमोरच उभी राहिली. पाठीमागून येऊन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी त्या आजीबाईला दूर करण्याचा प्रयत्न केला परंतु हसन मुश्रीफ यांनी त्या आजीचे गाऱ्हाणे शांतपणे ऐकून घेतले.
आजी हसन मुश्रीफ यांना सांगू लागली , ‘पावसाचं पाणी आमच्या घरात येतय, तेवढी गटार करून टाका’. यावर हसन मुश्रीफ म्हणाले कि, ‘मावशी…., त्या गटारीचे तर काम करूच, तुझ्या घरासमोरील रस्त्याचेही काम करून टाकू’. गेली तीस-पस्तीस वर्षे राजकीय आणि सामाजिक जीवनात गोरगरीब जनतेच्या पाठबळावरच यशस्वी वाटचाल करीत आलो आहे. जनता आणि माझी नाळ अतूट आहे, ती घट्ट जुळलेली आहे. एखादी ८० वर्षाची आजी बिनदिक्कतपणे रस्त्यातच माझी गाडी अडवून आपले गाऱ्हाणे सांगू शकते, त्याचीच ही प्रचिती आहे. असे यावेळी हसन मुश्रीफ यांनी आजींना सांगितले.
“हीच खरी लोकशाही……..!”
याप्रसंगी हसन मुश्रीफ यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान असताना एका जाहीर सभेसाठी गाडीतून उतरून चालत चालले होते. त्यावेळी अशाच एका म्हातारीने त्यांच्या हाताला धरून विचारले होते, लोकशाही – लोकशाही म्हणताय ती कुठे आहे? त्या वेळी यशवंतराव चव्हाण यानी त्या म्हातारीला दिलेले उत्तर मोठे समर्पक होते. श्री. चव्हाणसाहेब म्हणाले होते, ‘आजी एका उपपंतप्रधानाला रस्त्यात हाताला धरून प्रश्न विचारतेस हीच खरी लोकशाही……!’