- निनाद–किरीट यांची प्रस्तुती व डॉन स्टुडिओजची निर्मिती
- महाराष्ट्रात कलाक्षेत्रातील विविध विभागातील सुमारे 25 लाख लोकांचे गेले 497 दिवस काम बंद आहे. आता यांचं पुढे काय?
शबनम न्यूज | मनोरंजन
मनोरंजन । प्रतिनिधी
“लॉकडाऊन करताना सर्वात पहिल्यांदा कलाक्षेत्र शटडाऊन होतं आणि शिथिल होताना ते सर्वात उशिरा सुरू होतं. या सगळ्या कालावधीत कलाक्षेत्रातील कलाकार खूप पोळलेले आहेत आणि या विषयावर गाणे लिहिताना मी सुद्धा याच परिस्थितून जात असल्याने लिहायला फार प्रयास पडले नाहीत. “रंग विठ्ठला” हे गाणे म्हणजे विठ्ठलाची आळवणी आहे आणि ही आळवणी फक्त कलाकारांची नाही तर रसिकांची सुद्धा आहे.” असे उदगार या गाण्याचे गीतकार संदीप खरे यांनी “रंग विठ्ठला” गाण्याच्या लोकार्पण सोहळ्यात काढले.
कोरोना प्रादुर्भावामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटगृह, नाट्यगृह बंद आहेत, तसेच विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, यात्रा, मेळावे यांवर सुद्धा निर्बंध आहेत. याचा सर्वाधिक परिणाम संपूर्ण कलाक्षेत्रावर झाला आहे. महाराष्ट्रात कलाक्षेत्रावर अवलंबून असलेले लोककलावंत, गायक, वादक, तंत्रज्ञ, चित्र व नाट्य कलावंत, चित्रकार, नृत्य कलावंत, बॅकस्टेज आर्टिस्ट याबरोबरच कलाक्षेत्रातील विविध विभागातील सुमारे 25 लाख लोकांचे गेले 497 दिवस काम बंद आहे. आता यांचं पुढे काय? हा विचार घेऊन, या संकटातून आम्हाला बाहेर काढ आणि रसिक प्रेक्षकांची व आमची लवकरात लवकर भेट होऊ दे व “पक्षास जसे मिळते आभाळ तसे व्हावे, गजबजून यावे गोकुळ अन निर्भय नांदावे” या शब्दात कलाकार आणि रसिकांच्या वतीने विठ्ठलाला साकडे घालणारे निनाद किरीट प्रस्तुत व डॉन स्टुडिओज निर्मित “रंग विठ्ठला” या गाण्याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. संदीप खरे लिखित या गाण्याची मूळ संकल्पना आणि दिग्दर्शन धवल पाठक यांची आहे, तसेच निनाद सोलापूरकर व किरीट मांडवगणे यांनी संगीत दिले असून संगीत संयोजन देखील केले आहे, तर छायांकन ईशान जोशी, अथर्व भागवत, धवल पाठक यांनी केले आहे. पंचम स्टुडिओ येथे रेकॉर्डिंग झालेल्या या गाण्याचे मिक्सिंग अजय अत्रे यांनी केले आहे तर विशेष बाब म्हणजे गाण्याचं मास्टरींग इंग्लंड मध्ये झालं असून ते डोनल व्हेलन यांनी केले आहे. कोरोनाचे शासकीय नियम पाळून फक्त निमंत्रितांच्या उपस्थितीत झालेला हा लोकार्पण सोहळा मेघराज राजेभोसले, अविनाश चंद्रचूड, समीर हंपी, राहुल सोलापूरकर, रोहित नागभिडे, जितेंद्र अभ्यंकर, मिलिंद ओक, संदीप खरे, प्रदीप वैद्य, जितेंद्र भुरुक, विभावरी देशपांडे, विनोद सातव, हेमंत गुजराती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावर पुढे बोलताना संदीप खरे म्हणाले “हे जर लवकरात लवकर संपलं नाही तर अनेक चुली थंडावणार आहेत. आर्थिक व्यवहार बाजूला ठेवला तरी कुठल्याही कलाकाराची एक आस असते की त्याला त्याचं कलाकारपण हे तो स्टेजवर उभं राहून जेव्हा कला सादर करतो आणि समोरून बेहोशी मध्ये दाद येते, वाहवा येते तेव्हा मिळतं. त्यानी पोट भरत नाही ही गोष्ट खरी असली तरी मन भरणं ही एक प्रक्रिया असते आणि त्यावाचून मनुष्य अर्धवट असतो, ऑनलाइन कार्यक्रम सुरू आहेत पण प्रत्यक्षात हा जल्लोष अनुभवता येत नाही. आवरून सावरून थिएटरमध्ये जाणं, गजरे माळणं, खास शेरवानी घालणं असा आपण जो उत्सव करतो व अख्खी संस्कृतीच तिथे घेऊन जातो आणि हेच आपण सध्या मिस करतो आहोत. या सगळ्या परिस्थितीची जी प्रतिक्रिया झाली ती आम्हा कलाकारांतर्फे गीताच्या आणि व्हिडीओच्या रूपाने प्रकट करण्याचा व आमची जी तळमळ, कळकळ आहे ती पोहोचवण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे.”
यावेळी बोलताना मेघराज राजेभोसले म्हणाले “गेल्या काही वर्षात बऱ्याच नैसर्गिक आपत्ती आल्याने कलाक्षेत्राला थोडाफार त्रास होत होता परंतु गेल्या दीड वर्षात जे अनुभवयाला मिळालं ते कधीच पाहिलं नव्हतं. लॉकडाऊनमध्ये कलाकारांमुळे लोकांचे घरी बसून मनोरंजन होत होते म्हणून ते घरी बसू शकले पण अनलॉक झाल्यावर मात्र ते कलाकारांना विसरले. कलाक्षेत्रातील विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारांच्या मनातील सध्या असणाऱ्या भावना अत्यंत समर्पक शब्दात या गाण्यातून मांडण्यात आल्या आहेत त्यामुळे हे गाणं सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे जेणेकरून कलाकारांना मदत मिळू शकेल.” तसेच राहुल सोलापूरकर यांनी “ग्राहकांचा व्यापाऱ्यांना पाठिंबा अशी बातमी मी वाचली पण रसिकांचा कलाक्षेत्राला पाठिंबा अशी बातमी अजूनपर्यंत कुठेही वाचण्यात आली नाही यामुळे खूप वाईट वाटतं” अशी खंत व्यक्त केली. याप्रसंगी विनोद सातव, प्रदीप वैद्य, जितेंद्र भुरूक, जितेंद्र अभ्यंकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
कलाक्षेत्रातील वेगवेगळ्या विभागांचे प्रतिनिधित्व करणारे लोककलावंत, बॅकस्टेज कलाकार, प्रभात बँड, संगीत नाटक कलाकार, ध्वनी व्यवस्थापक तसेच प्रशांत दामले, सुधीर गाडगीळ, संजय जाधव, सुमित राघवन, संकर्षण कऱ्हाडे, सुयश टिळक, सिद्धार्थ चांदेकर, सुरेखा पुणेकर, विभावरी देशपांडे, मधुरा वेलणकर, शर्वरी जमेनिस, क्षितिष दाते, सुश्रुत मंकणी, दिग्पाल लांजेकर, अजय पुरकर, तुकाराम दैठणकर, साजिद मिरजकर, सीमा, रोहन, श्रीरंग देशमुख, जितेंद्र भुरुक, मैत्रेयी पेंडसे, कुणाल फडके, अपूर्वा साही, प्रदीप वैद्य, हर्षवर्धन केतकर, शिल्पा जोशी, यश सपन, ऋतुजा सोमण, वैभव जोशी, प्रमोद मराठे, मिलिंद मुळीक, अमोल काळे, मानसी व शाश्वती वझे, माई आर्टस्, शैला दातार, अजय अत्रे, हनुमंत भुजबळ, पूर्णिमा मनोहर, शुभांगी दामले, जागर संस्था, भैरवी देशमुख, तेजस देवधर, हेमंत गुजराती, श्रेयस बडवे, गजानन परांजपे, माधव वझे, विनोद सातव, रमाकांत परांजपे, प्रभाकर जोग, निखिल फाटक, श्याम भूतकर, जयदीप वैद्य, निनाद सोलापूरकर, किरीट मांडवगणे, अथर्व भागवत, ईशान जोशी, धवल पाठक, संदीप खरे यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे.