पिंपरी : प्रतिनिधी
सोशल मीडियाचा वापर वाढत असून, सायबर चोरटे नागरिकांना गंडा घालत आहेत. मोठ्या प्रमाणत फसणुकीचे गुन्हे घडत आहेत. त्यामुळे शहरासाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित होणे आवश्यक आहे. राज्य शासनाने या पोलीस ठाण्याला तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर भाजपाकडून करण्यात आली आहे.
शहर भाजपाचे मुख्य प्रवक्ते व संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी याबाबत मुख्र्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री अजित पवार यांना याबाबत निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केले आहे की, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिल्यानंतर 15 ऑगस्ट 2018 राजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आयुक्तालयाला साधनसामुग्री व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावर तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी भर दिला. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस आयुक्तालयांतर्गत स्वतंत्र सायबर सेल स्थापन करण्यात आला. मात्र सायबर गुन्हे वाढत असल्याने शहरासाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे आवश्यक असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलीस आयुक्तालयाकडून त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र महाविकास आघाडी सरकारने अद्याप या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही. त्यामुळे स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित झालेले नाही.
फेसबुक अकाउंट हॅक होण्याचे प्रमाण वाढत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप तसेच पिंपरी -चिंचवड महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे तसेच इतर काही राजकीय पदाधिकारी यांचेही फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले होते. तसेच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासह इतर काही पोलीस अधिका-यांच्या नावे बनावट अकाउंट तयार करून पैसे मागण्याचे प्रकार झाल्याचेही समोर आले. यावरून शहरात सायबर क्राईमचे वाढते स्वरुत दिसून येते. ऑनलाईन फसवणूक, अश्लील व्हिडीओ, मेसेज पाठवणे, हत्यारांसह व्हिडीओ व्हायरल करून दहशत पसरवणे, असे अनेक गुन्हे सायबरशी संबधित आहेत. अशा गुन्ह्यांचे शहरातील प्रमाण वाढतच आहे. तसेच इतर गुन्हे करतानाही सोशल मीडियाचा वापर होत आहे.
गुन्ह्यांचा तपास करण्यासाठीही तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागते. त्यासाठी स्वतंत्र सायबर लॅब आवश्यक आहे. तंत्रकुशल मनुष्यबळ तसेच सायबर तज्ज्ञांची नियुक्ती गरजेची आहे. स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित झाल्यास हे शक्य आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे मंजूर करण्यात यावे, अशी मागणी थोरात यांनी निवेदनातून केली आहे.