युवा मोर्चा – युवा वॉरियर्स‘ कडून राष्ट्रीय एकता, अखंडता व सामाजिक सुरक्षेचा संदेश
शबनम न्यूज | पिंपरी
देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘भारतीय जनता युवा मोर्चा – युवा वॉरियर्स‘ च्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात ‘आजादी का अमृत महोत्सव’ उपक्रमांतर्गत रविवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
युवा मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री वैभव सिह यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पक्ष कार्यालयातून सायकल रॅलीस प्रारंभ झाला. या सायकल रॅलीत युवा वॉरियर्सचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, युवा मोर्चा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तुषार हिंगे, स्वी. नगरसेवक मोरेश्वर शेडगे, अजित कुलथे, युवा मोर्चा पिं. चिं. अध्यक्ष संकेत चोंधे, दीपक नागरगोजे, चिटणीस भूषण माळी, व्यापारी आघाडी संयोजक राजेश राजपुरोहित, विद्यार्थी आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख राजदीप तापकीर, सोशल मीडिया संयोजक विक्रांत गंगावणे आणि असंख्य कार्यकर्ते व सायकल प्रेमी उपस्थित होते.
दरम्यान पिंपरीतील आंबेडकर चौक, चिंचवड स्टेशन व चिंचवडगावातील चापेकर चौकातील शक्तीस्थळ येथे भारत मातेचा जयघोष करून, तिरंग्याला अभिवादन करीत रॅलीचा समारोप झाला. प्रसंगी सर्व सायकलपटूनी त्यांचे सायकलिंग क्षेत्रातील विविध अनुभव सांगितले.आबालवृद्धांनी उदंड प्रतिसाद देत सायकल चालवण्याचा आनंद लुटला. विविध वयोगटातील व्यक्तींचा उत्स्फूर्त सहभाग हे या सायकल रॅलीचे वैशिष्ट्य ठरले.
राष्ट्रीय एकता, अखंडता आणि सामाजिक सुरक्षा हा संदेश घेऊन भारतातील प्रत्येक जिल्ह्यात भाजयुमोकडून अशा स्वरूपाची सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती युवा वॉरियर्सचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे यांनी दिली.