शबनम न्यूज | नवी मुंबई
प्रतिनिधी | मुंबई
बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. राज्य सरकार मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून आहे. विजय वडेट्टीवार यांच्या मदत व पुनर्वसन विभागाला तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ताबडतोब पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना दिली.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या जिल्ह्यांधिकाऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्या भागांना आवश्यक असलेला निधी जिल्ह्याधिकारांना ताबडतोब खात्यातून काढता येईल. तसेच निधीची कमतरता पडू देणार नाही, अशा सूचना अर्थमंत्री म्हणून मी स्वतः आणि मा. मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.
ग्लोबल वार्मिंगचे संकट जगावर आहे. परंतु मृग नक्षत्रात जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांमध्ये आपल्या राज्यात कुठेना कुठे अतिवृष्टी होत आहे, पूर येत आहे, नद्यांचे प्रवाह बदल आहेत, जमिनी खरडून वाहून जात आहे. यामुळे राज्यात प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत ताबडतोब पूरग्रस्त भागांचे पंचनामे करण्याबाबत चर्चा झाली. संपूर्ण अहवाल आल्यानंतर राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तेथील लोकांना मदत करण्यासाठी योग्य निर्णय घेतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. केंद्र सरकारचे नैसर्गिक आपत्तीविषयक निकष २०१५ मधले आहेत. सहा वर्षांमध्ये या मदतीमध्ये वाढ होणे गरजेचे आहे. याबाबत पंतप्रधानांसोबत चर्चा केली असता आम्ही १२ मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये निकषांमध्ये बदलाची मागणी केली. त्यावेळी पंतप्रधानांनी याबाबत संबंधितांना सूचना देण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
केंद्र सरकार नैसर्गिक आपत्तीचे निकष वाढवणार असल्याची चर्चा दिल्लीमध्ये सुरू आहे. मुख्यमंत्री याबाबत केंद्र सरकारशी स्वतंत्र पत्रव्यवहार करत आहेत. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. शेवटी केंद्र सरकार हा निर्णय घेईल पण आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे केवळ केंद्र सरकारच्या निर्णयावर अवलंबून न राहता आमची जी जबाबदारी आहे, ती अजिबात टाळणार नाही, ती योग्य पद्धतीने पूर्ण करू, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.