शबनम न्युज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील मुख्य मुद्यांवरून सर्वसामान्यांचे लक्ष भरकटवून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी राजकीय पक्ष कुठल्या स्तरावर गेले आहेत, हे महाराष्ट्र बघत आहे. अमुक घोटाळा, तमुक घोटाळा, गृह मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय यासर्वांकडे बोट दाखवून दलित, शोषित, पीडितांवर होणारे अन्याय, ओबीसींचे राजकीय आरक्षण, सरकारी नोकरीत पदोन्नतीत एससी, एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मुद्दयावरून महाविकास आघाडी लक्ष विचलित करण्याचे काम करीत आहे. विरोधी पक्ष भाजप त्यांना या सर्व बाबींमध्ये साथ देत असल्याचा घणाघात बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी मंगळवारी बीड येथे केला. संवाद यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमातून त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांना संबोधित करतांना महाविकास आघाडी सरकारचे धोरण तसेच भाजपच्या भूमिकेवर ताशेरे ओढले.
भाजपसह महाविकास आघाडीच्या काळात दलितांवर होणाऱ्या अन्यायात वाढ झाली. पंरतु, या सर्व अत्याचाराकडे सोयीस्कर कानाडोळा केला जातो. शोषितांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्वांनी बसपाच्या निळ्या झेंड्याखाली एकत्रित येण्याचे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले. संवाद यात्रेमुळे राज्यभरात बसपा बद्दल निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणामुळे सत्ताधाऱ्यांच्या पाया खालची जमीन सरकली आहे.त्यामुळेच सत्ताधारी-विरोधक रडीचा डाव खेळत आहेत. अशात शोषित ‘शासनकर्ते’ बनतील या भीतीने भाजपशी छुपी हातमिळवणी करीत सर्वच राजकीय पक्ष आरोप-प्रत्यारोपाचा खेळ खेळून इतर महत्वांच्या मुद्यांवरून मराठी बांधवांची दिशाभूल करीत असल्याचे देखील अँड.ताजने म्हणाले.
सर्वजन हित जोपासण्यासाठी बसपा हाच पर्याय आहे. मा.बहन मायावती जी यांच्या मार्गदर्शनाखाली,युवा नेतृत्व आनंद आकाश यांच्या नेतृत्वात राज्यात पक्षाला नवसंजीवणी देण्याचे काम संवाद यात्रा करीत आहे. गावोगावी, खेड्यापाड्यात यात्रा पोहचल्याने पक्षविस्तार आणि संघटन बांधणीला वेग आला असल्याचा दावा त्यांनी यानिमित्ताने केला. कार्यक्रमात प्रदेश प्रभारी प्रमोद रैना साहेब यांच्यासह प्रदेश सचिव डॉ.अनंत गायकवाड, झोन प्रभारी प्रशांत वासनिक, जिल्हा प्रभारी सतिश कापसे, जिल्हा अध्यक्ष अँड.अमोल डोंगरे, उपाध्यक्ष बाळासाहेब जगताप, प्रविण जगताप, महासचिव विद्यासागर हनवते, कोषाध्यक्ष अनिल शिरसाठ, संजय हराळ, सतिश पाटेकर, राजपाल बनसोडे तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
ऊसतोड कामगारांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू-रैना
ऊसतोड कामगारांच्या भरश्यावर बीड मधील सध्याचे प्रस्थ राजकीय नेते त्यावेळी मोठे झाले त्यांनीच आज या कामगारांना वाऱ्यावर सोडले. ऊसतोड मजूरांची अठरा विश्वदारिद्रयाची स्थिती अजूनही दूर झालेली नाही.त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. अशात या कामगारांच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी वेळी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी बसपा मागे हटणार नाही, असे आश्वासन प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांनी दिले. स्थानिक नेत्यांची घराणेशाहीमुळे बीड नगर पालिका तसेच परळी, अंबेजोगाईचे पूर्णतः वाट्टोळे झाले आहे. या नेत्यांच्या कुटुंबियांची राजकीय मक्तेदारी संपुष्टात आणण्याचे काम बसपा करणार आहे. करूणा मुंडे प्रकरणात जी तत्परता पोलिसांनी दाखवली,तशीच तत्परता इतर अँट्रोसिटी प्रकरणात राज्यातील पोलीस दाखतील का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.