शबनम न्युज | बीड
बीड | प्रतिनिधी
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्यानंतर हैराण झालेल्या अंबाजोगाई येथील वयस्क शेतकऱ्याने आपल्या लहानग्या नातवासह हातात नुकसानीची मोळी घेऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. अंबाजोगाई येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची बैठक सुरू असताना पावसाने नुकसान झालेली मोळी घेऊन डोळ्यात अश्रू दाटलेल्या या शेतकर्याने जयंत पाटील यांची भेट घेतली.
या शेतकऱ्याचे म्हणणे जयंत पाटील यांनी ऐकून घेतले. व त्यांना घाबरु नका सरकार तुमच्यासोबत आहे, असा धीराचा शब्द दिला. शेतकरी बांधवांना दिलासा देणे हे शासनाचे कर्तव्य आहे आणि शासन आपले कर्तव्य पूर्ण करत आहे, असा दिलासा त्यांनी दिला.
गेले तीन दिवस मराठवाड्यातील जिल्हयांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. केंद्र सरकारच्या कृपेने आधीच सोयाबीनचे भाव पडले आहेत. आणि त्यात आता ही निसर्गाची अवकृपा झाली असून सर्वत्र पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री धनंजय मुंडे करत असल्याचेही त्यांनी सांगितले.