शबनम न्यूज | अहमदनगर
अहमदनगर | प्रतिनिधी
बुथ कमिट्या तयार करा, २०२४ मध्ये श्रीरामपूर आणि राहाता या दोन्ही मतदारसंघात वेगळे चित्र पाहायला मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. आज राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान अहमदनगर जिल्हयातील या दोन्ही विधानसभा मतदारसंघांचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला.
सर्वात जास्त जनाधार लाभलेले नेतृत्व आदरणीय शरद पवार साहेबांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून, सर्वात अनुभवी नेत्याचं आपल्याला मार्गदर्शन लाभत आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. माझ्या पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा अपमान मला मान्य नाही असे सांगतानाच जिद्दीने लढा, अडचण आली तर मला फोन करा, फोन नाही उचलला तर मेसेज करा, उत्तर नक्कीच मिळेल अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे,महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख,, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, शिर्डी शहराध्यक्ष महेंद्र शेळके, युवक तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, महिला तालुकाध्यक्षा अर्चना कोते, शिर्डी युवक शहराध्यक्ष विशाल भडांगे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.