शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
डिजिटल व्यवहाराचा गैरफायदा घेणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी मोठ्या रकमा असलेल्या बँक खात्यांच्या ऑनलाइन व्यवहारांना लक्ष्य करीत फसवणुकीचे प्रकार सुरू केले आहेत. त्यामुळे एक चुकीची क्लिकही लाखोंचा फटका देऊ शकते, त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना सावध राहणे आवश्यक आहे.
बनावट फोन कॉल करून एटीएम व बँक खात्याची माहिती विचारून खात्यातून ऑनलाइन रक्कम परस्पर लांबविण्याचे प्रकार घडतात. अशी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, २४ तासांच्या आत एटीएम ब्लॉक करून पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास सायबर सेलच्या मदतीने खातेदारास त्याची रक्कम परत मिळू शकते.
कोणाही व्यक्तीसोबत सायबर क्राइम घडल्यास त्याने प्रथम बँकेत जाऊन एटीएम ब्लॉक करावे. बँक स्टेटमेंट काढून पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, त्यानंतर तक्रारीची फोटोकॉपी, ओळखपत्र व एक फोटो दिल्यानंतर सायबर सेलच्या मदतीने तुमच्या खात्यात पैसे मिळवण्याची प्रक्रिया सुरू होते. मात्र, तक्रार लवकर दाखल करावी लागते.
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार जर बेकायदेशीर इलेक्ट्राॅनिक ट्रान्सॅक्शन म्हणजेच ऑनलाइन व्यवहाराअंतर्गत फसवणूक झाली असेल तर यासाठी फसवणूक झालेल्या व्यक्तीला जबाबदार धरले जात नाही. जर या फसवणुकीसंदर्भात तातडीने आपल्या बँकेला माहिती दिली तर कायदेशी पावले उचलताना फायद्याचे ठरते.