शबनम न्यूज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
राज्यात साधारणपणे दीड वर्षांनंतर शाळा सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये काम करताना शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता लहान मुलांना कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी पालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.
शाळांमध्ये वेळोवेळी संपूर्ण सॅनिटायझेशन व्हावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, तसेच कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन व्हावे, हे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुनच राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. या बाबींवर देखरेख ठेवण्याचे काम हे जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने करावे तसेच खासगी शाळेच्या बाबतीत शाळेची मॅनेजमेंट टिम आणि पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.
राष्ट्रीय बाल सुरक्षा पथकाच्या (RBSK) माध्यमातून प्रत्येक शाळेला भेट दिली गेली पाहीजे. तसेच कोणीही बाधित व्यक्ती आढळल्यास त्वरित योग्य उपाययोजना व्हाव्यात, अशा सूचना पथकाला देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. या पथकाकडे अनुभवी डॉक्टर असतात, स्वतःच्या गाड्या असतात, अशाप्रकारची सर्व सामग्री त्यांच्याजवळ उपलब्ध असते. या पथकाकडून दुर्धर आजारग्रस्त विद्यार्थ्यांची तपासणी केली जाते व या आजाराचा उपचार राज्य सरकार मोफत करते अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. तसेच राष्ट्रीय बाल सुरक्षा पथक हे सध्याच्या परिस्थितीत शाळांना भेट देऊन विशेष लक्ष देईल, असा विश्वासही टोपे यांनी व्यक्त केला.