शबनम न्युज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. पंचनामे होत जातील तसे मदतीचे वाटप केले जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन सर्व माहिती घेतली. शेतकऱ्यांना मदत करणे, रस्ते, घरे आणि इतर नुकसानाबाबत मदत देणे यासाठी कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव आणून, त्यावर चर्चा करुन, दिलासा देणारा निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरही नवाब मलिक यांनी टीका केली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दोन वर्ष होत आली आहेत. विरोधी पक्षनेतेपद हे मुख्यमंत्र्यांपेक्षा कमी नसते, त्यामुळे फडणवीस यांनी जुन्या मानसिकतेतून बाहेर पडत विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत गेले पाहीजे. या माध्यमातूनही राज्याची सेवा केली जाऊ शकते, असे नवाब मलिक म्हणाले.