शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
आम्ही अनेक सरकार पाहिले. राज्य विषयी केंद्र सरकारचा दृष्टिकोन सहानुभूतीचा असायचा, पण आता भाजप सरकारकडून तसं होताना दिसत नाही. ईडी, सीबीआय,आयकर विभाग यासारख्या यंत्रणेचा वापर करून गैरव्यवहार सुरू आहेत. असा आरोप राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला.
यावेळी शरद पवार म्हणाले की, अजित पवारांच्या तीन भगिनींच्या घरी जाऊन आयकर विभागाने छापे टाकले. हा विषय कोर्टात असल्यामुळे मी अधिक काही बोलणार नाही. पण त्यात काहीही निष्पन्न होणार नाही. पण 14 ते 15 लोकं 5 दिवस छापे मारतात, त्यांचं काम संपल्यानंतरही त्यांना थांबायला सांगितलं जात होतं. एखाद्याच्या घरी इतके लोक पाठवून पाच-पाच दिवस ठेवून दबाव आणला जात आहे. चौकशी झाल्यावर पाहुण्याने जाणे आवश्यक होते. परंतु हा पाहूणा पाच-पाच दिवस मुक्काम करत होता. पाहूणा जेव्हा जात नाही तेच त्याची हकालपट्टी केली जाते. पाहुण्यांची काही चुकी नव्हती. त्यांना वरून तसे आदेश देण्यात आले होते.