शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील स्मार्ट सिटी कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला. या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचारचा पाढा वाचणारी फाईल महाविकासआघाडी वतीने देण्यात आली व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आवारात प्रचंड निषेध आंदोलन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेत स्मार्ट सिटीच्या नावाखाली सत्ताधारी भाजपाने करदात्यांच्या तिजोरीवर कसा दरोडा टाकला त्याचा शिवेसनेने अक्षरशः पर्दाफाश केला आहे. भाजपा नेते आमदार प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांचीच कंपनी असलेल्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून ही लूट झाल्याचे कागदोपत्री पुरावे सांगतात. राज्यभर ईडी, सीबीआय च्या माध्यमातून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्यांना या प्रकरणांबद्दल पत्र दिले असता त्यांची अक्षरशः बोबडी वळली अन तोंड बंद झाले आहे. आता शिवेसना आपल्या पध्दतीने या भोंदू किरीट सोमय्या यांच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा फाडणार आहे. महापालिका आयुक्तांनी तत्काळ कारवाई करावी अन्यथा शिवेसेना आगामी काळात याहीपेक्षा तडाखेबंद आंदोलन करणार, असल्याचा इशारा शिवेसेना संघटिका सुलभा उबाळे यांनी दिला आहे.
दरम्यान, तब्बल दन वर्षे या सर्व कामांना उशिर झाला कामाची ८० टक्के रक्कम आतापर्यंत अदा केल्याने महापालिकेची मोठी फसवणूक झाली आहे. कामाला उशिर झाला तर १० टक्के दंडाची तरतूद होती, पण निविदा पूर्व बैठकित कंत्राटी कंपनीच्या हितासाठी अवघा १ टक्के दंड आकारण्याचा नियम बदल केल्याने महापालिकेचे ४५ कोटी रुपयांचे नुकसान झाले, असेही सौ. उबाळे यांनी निदर्शनास आणून दिले.
स्मार्ट सिटी मध्ये किती मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयेंचा भ्रष्टाचार झाला आहे, त्याबाबत शिवसेनेने ३ जुलै २०२१ रोजी पुराव्यांसह लेखी पत्र महापालिका आयुक् राजेश पाटील यांना दिले होते. त्या पत्रातच स्मार्ट सिटीचे काम देतानाच ठेकेदार कंपनी, अधिकारी आणि भाजपाचे नेते यांच्यात कसे संगनमत आहे याबाबत निवेदन केले होते. भ्रष्टाचार किती मोठा आहे हे सांगणारे आकडे पाहिल्यावर डोळे पांढरे होणाऱ्या रकमा समोर आल्या. ९ हजार पाणी मीटर खरेदी करताना बाजारात जो मीटर फक्त १० हजार रुपयेंना मिळतो तोच पाच वर्षांचे देखभाल दुरुस्ती खर्चासह १ लाख १५ हजार रुपये प्रमाणे खरेदी केला आहे. म्हणजे २२ कोटी रुपयेंच्या पाणी मीटरसाठी चक्क ११० कोटी रुपये मोजले. अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणजे या कामाचे जवळपास १०० टक्के बिल अदा केले आहे. ४०० ते ५०० पटीत जादा रक्कमेचा भुर्दंड महापालिकेला पडला, मात्र प्रशासनाचाही तोबरा भरल्याने तेसुध्दा या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करतात. मीटर खरेदी करताना बाजारात त्याचे दर काय आहेत याची कुठलिही पडताळणी केलेली नाही, असेही लक्षात आले. त्यावेळी केंद्रात, राज्यात आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत ही भाजपाचीच सत्ता असल्याने हा भ्रष्ट व्यवहार झाला आणि टेक महिंद्राच्या माध्यमातून भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या कुंटुंबाशी संबंधीत क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला हे काम देण्यात आले, असा आरोप सौ. सुलभा उबाळे यांनी केला आहे.
मूळच्या प्रकल्पाचे इस्टिमेट हे ३५० कोटी रकमेचे होते. संगनमत झाल्याने निविदा निघाली त्यावेळी ते ५२० कोटीला स्विकारले. केवळ आमि केवळ आमदार लाड यांच्या नातेवाईकांची कंपनी म्हणून दिवसाढवळ्या ही कोट्यवधी रुपयांची लूट झाली आहे. मूळ या कामाची वर्कऑर्डर ही मार्च २०१९ ची होती. अवघ्या एक वर्षांत म्हणजे २०१९ मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. आता दोन वर्षे लोटली आणि २०२१ हे वर्ष संपत चालले तरीही ८० टक्के रक्कम अदा करूनही काम पूर्ण झालेल नाही. कामाला उशिर झाला तर १० टक्के दंडाची तरतूद होती. प्रसाद लाड यांच्या कुंटुंबाची संबंधीत कंपनी म्हणून निविदापूर्व चर्चेत दंडाची रक्कम १० टक्के वरून १ टक्के करण्यात आली. त्यामुळे कंपनी बेफिकीरी वाढली. कोरना सुरू होण्यापूर्वीच काम पूर्ण होणे अपेक्षित होते, पण तब्बल दोन अडिच वर्षे कामाचा तपास नाही. उद्या कंपनी पळऊन गेली तरी महापालिका प्रशासन काही करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे, असे उबाळे यांनी नमूद केले. जुन्या नियमानुसार कामाला उशिर झाला म्हणून कंपनीला ४५ कोटी रुपयेंचा दंड झाला असता, पण आता ते त्यांचा बचाव झाला आहे, असे उबाळे यांनी स्पष्ट केले.
स्मार्ट सिटीच्या या कामात टेक महिंद्राला मूळ काम असून ते Joint Venture ने क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड ला सब कॉन्ट्रक्टिंग केले असून तेसुध्दा बेकायदा असल्याचा आक्षेप उबाळे यांनी घेतला आहे. त्याचा परिणाम जे काही काम पूर्ण झाले ते अत्यंत निकृष्ट प्रतिचे असून त्यामुळे करदात्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या कामांतर्गत उभे केलेले चौकाचौकातील इलेक्ट्रीक फलक आताच बंद पडले असून सीसी कॅमेरे सुध्दा अत्यंत निकृष्ठ प्रतिचे असल्याचे सौ. सुलभा उबाळे यांनी निदर्शनास आणून दिले.
स्मार्ट सिटीतीत जे मुद्दे उबाळे यांनी उपस्थित केले होते त्यावर १४ ऑक्टोंबर रोजी सुनावणी घेण्यात आली. त्या अनुशंगाने पुन्हा या सर्व विषयांकडे वेधण्यासाठी उबाळे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना गुरुवारी (दि.२१) एक लेखी निवेदन दिले आहे. त्यात निविदेच्या कामाची मुदत किती होती, कितीवेळा मुदतवाढ दिली व ती का दिली तसेच नियमानुसार दंड लावला का, मूळ अंदाजापेक्षा ५०० पट जादा दराने पाणी मीटर खरेदी कशी केली, १० टक्के दंडाची अट १ टक्के शिथिल करण्याचा निर्णय का केला अशी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. सर्व कामाचे आता ऑडिट करण्याची मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.
यावेळी शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेना नगरसेवक राहुल कलाटे, शिवसेनेचे शहर अध्यक्ष, नगरसेवक सचिन भोसले, राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित गव्हाणे, राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर, शिवसेनेचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.