शबनम न्युज | मुंबई
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या चौथ्या पर्वाच्या तिसऱ्या दिवशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्षसंघटना वाढवण्यासाठी सर्वांनी मिळून काम करायला हवे. आपल्या सर्वाचा एकच नेता आहे, ते म्हणजे पवार साहेब, तुम्हाला फक्त पवार साहेबांसाठी काम करायचे आहे हे लक्षात ठेवा आणि कामाला लागा असे जाहीर आवाहन जयंत पाटील यांनी सर्व सभेला केले.
पुढे जयंत पाटील म्हणाले की, आपल्या भागात राष्ट्रवादी पूर्वपदावर आणून जुने दिवस परत येतील हा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. पक्षाला इथे स्कोप आहे असे अनेक सर्व्हे सांगतात. त्यामुळे मतमोजणीची तारीख डोक्यात ठेवून लोकांच्या छोट्या मोठ्या कामांची पूर्तता करा. आरोग्याशी निगडीत, रेशनकार्डची कामे, वॉटर मीटर अशाप्रकारच्या सर्व स्थानिक प्रश्नांची सोडवूक करा. आपला नेता सर्वात जास्त अनुभवी आहे, हे विरोधकांना विचारले तरी ते हेच सांगतील. पवार साहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेकजण राष्ट्रवादीत येऊ इच्छित आहे. त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढवा, असे ते म्हणाले.
यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सभेला मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणला. १९९९ ला राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पक्षाने सर्वत्र आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. तीच घोडदौड मिरा-भाईंदरमध्ये ही कायम ठेवली त्यामुळे सुरुवातीचा बराच काळ इथे राष्ट्रवादीची सत्ता होती. मधल्या काळात इथे सत्तांतर झाले असले तरी आता आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे. येणाऱ्या काळात बऱ्याच गोष्टी घडतील, फक्त आपली एकजूट आपल्याला कायम ठेवायची आहे असे ते म्हणाले. आगामी निवडणुकीत आपण इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केला.
या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राज्य सचिव संतोष पेंडूलकर, कोकण विभागीय विद्यार्थी अध्यक्ष किरण शिखरे, विद्यार्थी राज्य समन्वयक शुभम जटाळ, निर्मला साबळे मा.महापौर मुंबई विभागीय हिंदी भाषिक सेल अध्यक्ष मनिषा दुबे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.