शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरावर लादेलेले दिवसाआड पाणी पुरवठ्याचे धोरण हटविण्यात यावे, अशी मागणी शहरअध्यक्ष, गटनेता मनसे, सचिन चिखले यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त, राजेश पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवड शहरात तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तांत्रिक कारणे देत गत २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यावेळी शहरवासीयांना केवळ सहा महिने हा त्रास असेल, त्यांनतर नियमित पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. आज जवळपास दोन वर्षांपासून ‘दिवसाआड’ पाणी पुरवठ्याची टांगती तलवार शहरवासीयांच्या मानगुटीवर बसलेली आहे.
कोरोना काळात देखील शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरलेले असताना प्रशासनाच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे नागरिकांना पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सणासुदीच्या काळात देखील या धोरणात पालिकेकडून शिथिलता दिली जात नाही.
आंद्रा व भामा आसखेड धरणाच्या पाण्याचे गाजर अजून किती दिवस लोकांना दाखवणार आहात? नागरिकांची दररोज पाणी देण्याची मागणी वाढत आहे. १ नोव्हेंबरपासून शहरात सर्वत्रच टप्पाटप्प्याने नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी आपण आयुक्त या नात्याने पुढाकार घ्यावा. नागरिकांना नियमित पाणी देऊन दिलासा द्याल, अशी अपेक्षा करतो. अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने पाणी देण्यास भाग पाडेल. याची नोंद घ्यावी. असेही सदर निवेदनात सचिन चिखले यांनी नमूद केले आहे.
यावेळी निवेदन देताना त्यांच्या सोबत रुपेश पटेकर – शहरसचिव, अश्विनी बांगर – महीला अध्यक्ष मनसे,
सिमा बेलापुरकर – शहर सचिव, संगीता देशमुख – उपशहरअध्यक्ष , अनिता पांचाळ – उपशहरअध्यक्ष ,
श्रद्धा देशमुख – विद्यार्थी सेना शहर संघटक आदी उपस्थित होते.