शबनम न्यूज |
लोकांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करणाऱ्या विषयांवर लोक बोलत नाहीत हे विशेष आहे. पाशवी बहुमताच्या आधारावर मी काय काय करू शकतो हे दाखवण्याच्या नादात घेतला गेलेला मूर्ख निर्णय म्हणजे नोटबंदी.
आज या मूर्ख निर्णयाला ५ वर्षे झाली. पण नोटबंदी मुळे माझा व्यवसाय बंद झाला असे म्हणणारे लोक अजूनही सावरले नाही. देशात शेतकरी वर्ग आत्महत्या करत होता. नोटबंदी नंतर व्यावसायिक, उद्योजक आणि नोकरदार वर्गाच्या देखील आत्महत्या देशभरात वाढल्या. करोडो लोकांना बेरोजगार करणारा एक निर्णय म्हणजे नोटबंदी. विशेष म्हणजे या फसलेल्या निर्णयावर २०१९ ची निवडणूक अजिबातच लढवली गेली नाही. एयर स्ट्राईकला पुढे दामटून देशभर लोकांना देशभक्तीचे डोस देऊन २०१९ ची निवडणूक जिंकली गेली.
खरेतर यात भाजपचा दोष नाही. दोष जनतेचा आहे. जनतेला आपल्या समस्या समजल्या नाहीत. कोणीही यावं आणि रात्री ८ वाजता म्हणावं उद्यापासून हजार आणि पाचशे च्या नोटा बंद आणि आपण ते मान्य करावे. करोडो लोकांनी बँकांच्या लाईनीत उभे रहावे. रांगेत आपला जीव द्यावा. कारण काय तर सीमेवर जवान उभे राहतात तर आपण देशासाठी बँकेच्या रांगेत का उभे राहू शकत नाही काय ? महिन्याला घर देखील चालवायचे ज्यांचे वांदे होते त्यांनाही देशातील काळा पैसा बाहेर येईल याचा आनंद होऊ लागला होता. न्हवे त्यांना तसे करण्यास प्रेरित केले जात होते. पण अशा लोकांची या काळात जास्त हेळसांड झाली आणि काहीजण कायमचे डुबले ?
सध्या नोटबंदीवर काहीही बोलले जात नाही. एवढं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील हा खूप कौतुकास्पद निर्णय होता असेही म्हणण्याची डेरिंग करत नाहीत. कारण त्यांचे या विषयावरून वाभाडे काढले जातील हे त्यांना चांगलं माहिती आहे. त्यासाठी ते विषयावर कधीच बोलत नाहीत. ५० दिवसात सर्व ठीक नाही झाले तर मला फाशी द्या. असे म्हणणाऱ्या मोदींनी या विषयावर कायमचे बोलणे टाळावे यापेक्षा जास्त मोठा जनतेचा अपमान काय असू शकतो ? याचा विचार लोकांनी करायला हवा. नोटबंदीने काय साध्य झाले यावर भाजपचा एकही नेता आज बोलला नाही. काळा पैसा गेला कुठे ? मोठया चलनाने भ्रष्टाचार वाढतो म्हणणाऱ्या भाजपने २ हजार ची नोट आणली. हा मोठा विनोदच आहे.
नोटबंदी देशातील लोकांनी सहन केली म्हणून ४ तासात लॉक डाऊन देखील लादला गेला. नोटबंदीने कोलमडून पडलेल्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचे कारण देण्यात हे सरकार यशस्वी ठरले. नोटबंदीने नुकसान झाले म्हणणारे आता लॉक डाऊन ने नुकसान झाले म्हणतात. जीव वाचला हे महत्वाचं. पण ४ तासात केलेला लॉक डाऊन हा जाणीवपूर्वक केला गेला हे आपण समजून घ्यायला हवे.
मोदींना देशातील जनतेच्या त्रासाचे काहीही पडलेले नाही. काही राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीत जे अपयश मिळालं त्याने कुठे सरकार थोडं भानावर आलं आणि महागाई थोडी कमी केली. मोदींना वठणीवर आणायचे असेल तर इथून पुढे आपला रोष हा मतदानातून दाखवावा लागणार आहे. हे आता जनतेने समजून घ्यायला हवे. समजलं तर ठीक