शबनम न्युज | मुंबई
आज दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. चा शतकोत्तर दशकपूर्ती सोहळा राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थित पार पडला.
राज्यातील सहकार क्षेत्राला उभारी देण्यासाठी या बँकेने मोठे योगदान दिलेले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्व. वैकुंठभाई मेहता, विठठ्लदास ठाकरसी, धनंजय गाडगीळ यांच्या तैलचित्रांचा अनावरण सोहळादेखील आज संपन्न झाला. बँकिंग क्षेत्राशी बांधिलकी असणाऱ्या आणि या क्षेत्रातील कर्तृत्ववान अशा या व्यक्ती आहेत. या प्रत्येक व्यक्तीचे सहकार क्षेत्रात योगदान आहे. असे मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केले.
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या शतकोत्तर दशकपूर्ती सोहळ्यास आज उपस्थित होतो. राज्यातील सहकार क्षेत्राला उभारी देण्यासाठी या बँकेने मोठे योगदान दिलेले आहे. बँकेचा ११ दशकांचा प्रवास हा महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचे पान आहे. pic.twitter.com/2pdBSgMe05
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 11, 2021
पुठे बोलताना शरद पवार म्हणाले कि, विठ्ठलदास ठाकरसी हे प्रामुख्याने शहरी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना उभे करणारे महत्त्वाचे नेते होते. या बँकेचा पाया मजबूत करण्यामागे त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्याकाळचे मुंबई राज्य हे महाराष्ट्र व गुजरातमुळे एकत्र आलेले राज्य होते. त्या कालखंडात सहकार व वित्त खात्याची जबाबदारी ही वैकुंठभाई मेहता यांच्यावर होती. सहकार क्षेत्रातील अनेक संस्था उभारण्यामागे वैकुंठभाईंचे मोठे योगदान होते. माझे वडीलही सहकार क्षेत्रात काम करत होते. वैकुंठभाई व माझे वडील इस्लामपूर तालुक्यातील इस्लामपूर सोसायटीचे कामकाज अधिक बळकट करण्यासाठी एकत्र गेले होते. अशा लहान संस्थांमध्येदेखील वैकुंठभाई स्वतः जातीने लक्ष घालत. सबंध देशात सहकार चळवळीला योग्य दिशा दाखवण्याचे काम त्यांनी केले. धनंजयराव गाडगीळ यांचे तर देशातील विविध मंडळांचे उपाध्यक्षपद ते या बँकेपर्यंत अनेक ठिकाणी योगदान आहे. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना हा प्रवरा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जातो. या कारखान्याचे पहिले चेअरमन हे धनंजय गाडगीळ होते. गाडगीळ यांनी अर्थतज्ज्ञ म्हणून पहिल्या सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची कामगिरी केली. केवळ यावरच न थांबता अशा अनेक संस्था कशा उभ्या करता येतील याकडे त्यांचे लक्ष होते. गाडगीळ यांचे कर्तृत्व आणि दूरदृष्टी लक्षात घेऊन स्व. इंदिरा गांधी यांनी त्यांची नेमणूक देशाच्या नियोजन मंडळाच्या उपाध्यक्षपदी केली. यातून देशाच्या अर्थकारणाला दिशा दाखवण्याचे काम गाडगीळ यांनी केले. स्व. वसंतदादा पाटील, भाऊसाहेब हिरे, शामराव कदम यांचा बँकेत सहभाग होता. यापूर्वीच्या काळात अनेक मोठी मंडळी या बँकेत होऊन गेली. अशा अनेक लोकांचे कर्तृत्व आम्ही पाहिले असल्याने बँकेचे काम आणि त्याची उपयुक्तता याविषयी आम्हाला अत्यंत जवळीक होती. त्यामुळे या बँकेच्या उभारणीसाठी ज्यांनी योगदान दिले अशा व्यक्तींची तैलचित्रे इथे असणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. नव्या पिढीला या सर्वांची ओळख या माध्यमातून होईल. असे हि यावेळी शरद पवार यांनी सांगितले आहे.