शबनम न्युज | मुंबई
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात माध्यमातून चुकीच्या बातम्या पेरण्याचे काम सुरू आहे, भाजप नेते माध्यमांमधून याबाबत विविध प्रतिक्रिया देत आहेत. या सर्व प्रकरणावर “चोरोंने हे ललकारा, मिलेगा जबाब करारा” असा इशारा नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला.
वक्फ बोर्डामध्ये आम्ही क्लीनअप अभियान सुरू केले आहे. ईडी या मोहिमेत खरंच सहकार्य करत असेल तर ज्या भाजपच्या माजी मंत्र्यांनी मंदिराच्या नावाखाली शेकडो एकर जमीन बळकावण्याचे काम केले आहे त्यांना जेलमध्ये टाकावे, अशी अपेक्षा मलिक यांनी व्यक्त केली. तसेच या माजी मंत्र्यांचे भांडेफोड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ईडी अधिकाऱ्यांचे जे ‘आका’ असतील त्यांना खुश करण्यासाठी कारवाईचा खेळ खेळला जातोय. जर खरच काही सत्यता असेल तर ईडीने पत्रकार परिषद घेऊन याचा खुलासा करावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. ही लढाई आम्ही चोरांच्या विरोधात छेडली आहे, याला शेवटपर्यंत नक्कीच घेऊन जाणार, असा पुनरोच्चार त्यांनी केला.