भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलावर वाहतूक निर्देशक पट्टे काढा : नगरसेवक सागर गवळी
– पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन
पिंपरी । प्रतिनिधी
पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे नव्याने उभारलेल्या साधारण दीड किलोमीटर लांबीच्या या उड्डाणपुलाचे पिवळे व पांढरे पट्टे गायब झाले आहेत. तसेच, पुलाची रंगरंगोटी करावी लागणार आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपा नगरसेवक सागर गवळी यांनी केली आहे.
याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, राजमाता जिजाऊ उड्डाणपूलावर वाहतूक वर्दळ असते. पण, रस्त्यावर वाहन चालकांना दिशादर्शक ठरणारे पांढरे, पिवळे पट्टे नाहीसे झाले आहेत. तसेच, नागमोडी वळणावरील पुलाच्या कठड्यावरील सूचक पिवळा रंग पूर्णपणे निघाल्याने रात्री प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना अंदाज लागत नाही, अशी वाहनचालकांची तक्रार आहे.
तसेच, पुलावरील वाहनांचा वेग कमी करणारे वेग नियंत्रकावरील रंग नाहीसा झाल्याने वाहनचालकांची भंबेरी उडते. तसेच, उड्डाणपुलावरील रस्त्यावर पांढरे, पिवळे पट्टे नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. दुसरीकडे, सुशोभकरणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने उड्डाणपूलाला अवकळा प्राप्त झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने उड्डाणपुलाची रंगरंगोटी आणि दिशादर्शक पट्टे काढावेत, अशी आमची आग्रही मागणी आहे. वाहनचालक आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महापालिका प्रशासन तात्काळ कार्यवाही करावी, असेही गवळी यांनी म्हटले आहे.