शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१९ नोव्हेंबर ) :- राष्ट्रनिर्माणसाठी, योग्य ते योगदान देण्यासाठी, सेवा व समर्पण या भावनेतून बाबासाहेबांनी आयुष्यभर काम केले. त्यांच्या कार्यासाठी पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण यासारखे पुरस्कार मिळाले तर दुसरीकडे त्यांच्यावर टीकाही झाली पण त्याबद्दल कधी त्यांनी कडवट प्रतिक्रिया दिली नाही. हे त्यांच्या मनाचे मोठेपण होते. असे मत इतिहास अभ्यासक गणेश धालपे यांनी व्यक्त केले.
इतिहास प्रेमी मंडळ पिंपरी-चिंचवड यांच्यावतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना अभिवादन करण्यासाठी, पिंपळे गुरव येथे श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. याप्रसंगी ते बोलत होते. 18 वर्षे बाबासाहेबांचा सहवास लाभलेल्या, श्री धालपे यांनी अनेक आठवणी सांगितल्या. बाबासाहेबांची स्वयंशिस्त, काटेकोरपणा, वक्तशीरपणा व लोकांवरचे निरपेक्ष प्रेम, याबद्दलचे प्रसंग तसेच त्यांचे प्राणीमात्रांवरचे प्रेम याबद्दलच्या आठवणी त्यांनी जागवल्या.
याप्रसंगी इतिहास अभ्यासक श्रीकांत चौगुले, डी डी फुगे, शिवाजीराव शिर्के, दुर्ग अभ्यासक संदीप तापकीर ,मोडीलिपी अभ्यासक बहि चिंचवडे, साहित्यिक डॉ दिलीप गरुड, संतोष घुले ,अनिल वडघुले मानवाधिकार संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार, सखाराम रेडेकर, संयोजक प्रदीप गायकवाड तसेच साईराज भोसले, श्रेयस भंडारी, भरत क्षेत्रे, प्रसाद परब ,सुरेश सकट आदी उपस्थित होते. याप्रसंगी अनेकांची मनोगते झाली. त्यांनी बाबासाहेबांच्या आठवणी सांगितल्या.