शेतीला उद्योगाचा दर्जा देऊन शेतक-यांचा सन्मान करावा – सचिन साठे
शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
‘जय जवान जय किसान’ हाच नारा कृषीप्रधान भारत देशाला प्रगती पथावर नेऊ शकतो. हे कटूसत्य अकरा महिन्यांहून जास्त काळ केलेले आंदोलन आणि सातशेंहून जास्त शेतक-यांनी दिलेल्या बलिदानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसकपणे सत्याग्रह करण्याचा आदर्श देशवासियांपुढे घालून दिला आहे. त्याच मार्गाने मागील अकरा महिन्यांपासून केंद्रातील हुकूमशाही सरकारविरुध्द शेतकरी दिल्लीत आंदोलन करीत होते. शुक्रवारी शेतकरी विरोधी प्रस्तावित तीन काळे कायदे मागे घेत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी जाहिर केले हे हुकूमशाही भाजप सरकारला उशीरा सुचलेले शहाणपण आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
मतदार भाजपाच्या भूलथापांना आणि फसव्या आश्वासनांना बळी पडले आणि केंद्रात सत्ता परिवर्तन झाले. भाजपाला या मिळालेल्या पाशवी बहुमतांच्या जोरावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीला उद्योगाचा दर्जा देऊन शेतक-यांचा सन्मान करावा. शेती आणि शेतीपुरक व्यवसाय यामुळे सर्वात जास्त रोजगार निर्मिती होते. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सिंचन क्षेत्र वाढवून वाढलेले शेती उत्पादन निर्यात करुन परकीय चलन देखिल मिळविता येईल. शेती व शेतीपुरक व्यवसायास सोयी, सवलती व सुविधा केंद्र सरकारने देऊन प्रोत्साहन द्यावे असेही सचिन साठे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
देशामध्ये रोजगार आणि विकास होण्यासाठी जय किसान आणि देशाच्या सीमारेषा सुरक्षित रहाव्यात यासाठी जय जवान हाच नारा योग्य आहे. यामुळेच देश सुरक्षित आणि प्रगतीशीर राहिल. अखेर बळीराजाच्या एकजूटीपुढे बाहुबली सरकारला झुकावे लागले. या शेतकरी आंदोलनास मिळालेले यश म्हणजे या लढ्यात सहभागी होणा-या सर्व शेतकरी बंधु, भगिनींचे आणि कॉंग्रेससह या आंदोलनास पाठिंबा देणा-या इतर सर्व पक्षांचे, शेतकरी संघटनांचे आहे असेही महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.