सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
शबनम न्यूज :मुंबई (दि.२४ नोव्हेंबर ) :- महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी म्हणजे कोरोनाच्या रुग्णवाढीचा आलेख कमी झाला आहे. तरीही नागरिकांनी गाफील न राहता काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना केले.
चाईल्ड टास्क फोर्सचे डॉ. प्रभू यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पहिली ते चौथीच्या वर्गातील मुलांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेऊन त्यांनाही शाळेत जाऊ दिले पाहीजे. तसेच १२ ते १८ या वयोगटातील विद्यार्थ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करायला हवे. त्यानंतर त्यांना शैक्षणिक संस्थेत प्रवेश द्यायला कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होण्याबाबत उद्या होणाऱ्या (२५ नोव्हेंबर) मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री यांच्या सूचनेनंतर निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
तसेच कोवॅक्सिन ही लस लहान मुलांना देण्यास अडचण नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत निर्णय घ्यावा. जर केंद्राने निर्णय घेतला तर राज्य सरकारची लहान मुलांना लस देण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले.
राज्यात सिनेमागृह आणि नाट्यगृहांना ५० टक्के आसन क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. पुढील काळात निर्बंध कमी करण्याचा विचार केला जाईल, मात्र कोरोना कमी झाला असला तरीही कुठल्याप्रकारे गर्दी वाढणार नाही, याची काळजी घ्यायला लागणार आहे. युरोप आणि अमेरिकेत डेल्टा व्हायरसचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यानुसार आपण कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये डेल्टा व्हेरियंट सोडून कोणताही नवी व्हेरियंट तपासणीत समोर आलेला नाही. ही समाधनाची बाब आहे. तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता असली तरी ती सौम्य स्वरुपाची असेल. त्यामुळे फार काळजीचा विषय नाही, तरीही नियम पाळणे आणि लसीकरणावर भर देणे, यावर राज्य सरकारचा भर असणार आहे, असे राजेश टोपे म्हणाले.