शबनम न्युज | मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. काल केंद्रीय कॅबिनेटमध्ये तो निर्णय पारीत करण्यात आला. त्याचबरोबर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत २०२२ मार्चपर्यंत वाढवण्यात आली. पोटनिवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता होणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर या पाच राज्यातील निवडणुकांमध्ये भाजप जिंकू शकत नाही, हा अहवाल समोर आल्यानंतर केंद्र सरकार असे निर्णय घेत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.
केंद्राने अचानक पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क दीर्घ कालाने कमी केले. कालपर्यंत त्यांना शेतकरी दहशतवादी वाटत होते. पण आज शेतकऱ्यासांठी तीन कृषी कायदे मागे घेण्यात आले. कोविडच्या काळामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली होती, या योजनेला बिहार निवडणुकीच्यावेळी त्यानंतर बंगालच्या निवडणुकीच्यावेळी आणि आता पाच राज्यातील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही मुदतवाढ देण्यात आली. केंद्र सरकारने कितीही असे निर्णय घेतले तरी लोकांना कळून चुकले आहे की, हे सरकार जनविरोधी, कामगार विरोधी, शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे आता होणाऱ्या पाच राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव निश्चित आहे, असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले.