शबनम न्यूज | पुणे
1971 चा भारत पाकिस्तान युद्धातील भारताचा विजय म्हणजे अनेक दशकांनंतर भारताने खरा पहिला निर्णायक विजय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाखाली मिळवला. हा विजय म्हणजे जशी लोकशाहीची ताकद आहे तशी देशाला ओळख देणार्या व एकत्र ठेवणार्या राज्य घटनेचीही ताकद आहे. भारतीय सैन्य, हवाई दल आणि नौदल यांच्या प्रभावशाली एकत्रित कामगिरीचे प्रत्येकाने कौतुकच केले पाहिजे असे सांगून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुवर्ण विजय व्दीसप्ताह अतिशय कल्पकतेने साजरा करीत असल्याबाबत याचे संयोजक आबा बागूल यांचे कौतुक व अभिनंदन केले. पुणे मनपा काँग्रेसचे गटनेचे आबा बागूल यांच्या संकल्पनेतून 3 ते 16 डिसेंबर या काळात आयोजित सुवर्ण विजय व्दीसप्ताहमधील चित्रकारांच्या पेंटिंग उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी लेफ्टनंट जनरल एस. एस. मेहता (निवृत्त), ब्रिगेडिर अजित आपटे (निवृत्त) व ज्येष्ठ व्यंगचित्रकार चारूहास पंडित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानाबाहेरील पदपथावर पुण्यातील सुमारे 25 नामवंत चित्रकारांनी इंदिरा “गांधी आणि 1971 चे युद्ध” या विषयावर पेंटिंग्ज काढली. सकाळी 7 ते सायंकाळी 5 या काळात हे चित्रकार आपल्या कुंचल्यातून चित्रे साकारत असताना ती बघण्यासाठी शेकडो पुणेकरांनी गर्दी केली होती.
सुवर्ण विजय व्दीसप्ताहातील चित्रकारांच्या या अभिनव उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी या संकल्पनेचे जनक पुणे मनपा काँग्रेसपक्ष गटनेते आबा बागूल यांनी सर्वांचे स्वागत व सत्कार केला. आबा बागुल म्हणाले की, सुवर्ण विजय व्दीसप्ताह आयोजित करताना चित्रकारांनी पंतप्रधान इंदिरा गांधी व 1971 चे युद्ध या विषयावर थेट सादरीकरण करायची अभिवन कल्पना आम्ही येथे साकारली आहे. या युद्धातील विजयाची व सैन्य दलाच्या पराक्रमाची माहिती युवा पिढीपर्यंत जावी यासाठी असे कार्य क्रम आयोजित केले आहेत. लष्कर आणि जनता यांना एकमेकांशी संवाद करण्याची फारशी संधी नसते त्यामुळे अनेक निवृत्त सैन्य अधिका यांना या व्दीसप्ताहात आवर्जून निमंत्रित केले आहे असे सांगून आबा बागूल यांनी चित्रकार चित्र साकरताना ते बघायला आलेल्या शेकडो पुणेकरांचेही आभार मानले.
या प्रसंगी बोलताना लेफ्टनंट जनरल एस.एस. मेहता (निवृत्त) यांनी आबा बागूलांच्या पुढाकाराने साजरे होणार्या सुवर्ण विजय व्दीसप्ताहाचे कौतुक करून म्हटले की, पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धात भारताने निर्णायक विजय मिळवला. हे युद्ध म्हणजे नरसंहार, क्रूरता विरूद्ध मानवता यांच्यातील युद्ध होते. हा देशाचा विजय आहे. देशवासीयांचा विजय आहे असे मी मानतो. देशाचे सैन्यदल, देशवासीय जनता आणि राजकीय व्यवस्था (लोकशाही) हे तिन्ही घटक एकत्र आल्यामुळे आपण हा निर्णायक विजय मिळवला. त्यामुळे हा लोकशाहीचा विजय आहे, असे ते म्हणाले.
या प्रसंगी ब्रिगेडियर अजित आपटे (निवृत्त) यांनी आपल्या कुटुंबाच्या चार पिढ्या सैन्य दलात आहेत असे सांगून म्हटले की, 1971 युद्धात माझे वडिलही लष्करात ब्रिगेडियर होते. मी सुद्धा नुकताच सैन्यदलात प्रवेश केला होता. मला या युद्धात भाग घेण्याची संधी मिळाली असे सांगून ते म्हणाले की, माझे बंधू प्रदीप आपटे हे हवाईदलात होते व त्यांनी चांगले शौर्य गाजवले पण पाकिस्ताने त्यांचे विमान पाडले आणि छळ करून त्यांना ठार केले. आपण मात्र 1971 युद्धात शरण आलेल्या 93000 पाकिस्तानी सैनिकांना चांगली वागणूक देऊन परत पाठवले. हीच भारताच्या सुसंकृत सैन्याची ओळख आहे, असे ते म्हणाले.
या प्रसंगी ज्येष्ठ व्यंगचित्रकार चारूहास पंडित म्हणाले की, या युद्धाच्यावेळी मी चिंटूच्या वयाचा होतो. त्यावेळी वर्तमानपत्र आणि रेडिओ ही महितीची माध्यमे होती. या युद्धानंतर या विजयावर व्यंगचित्रांची पुस्तके निघाली होती आणि त्यातील अनेक पुस्तकातील मी सर्व व्यंगचित्रे त्यातील संवादासह पुन्हा काढली आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन घनश्याम सावंत यांनी केले. शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपला. या कार्यक्रमास माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेविका लता राजगुरू, गोपाळ तिवारी, रोहित टिळक, मुकतार शेख, नरेंद्रपालसिंग बक्षी, सौ जयश्री बागुल, अमित बागुल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. चित्रकारांच्या या कलाकृती शिवदर्शन येथील वसंतराव बागूल उद्यानातील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलादालनात 18 डिसेंबरपर्यंत बघण्यास नागरिकांना उपलब्ध असतील.