शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ डिसेंबर) :- महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजाचा असलेला लढा अखेर यशस्वी झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त मंजुरी दिली आहे. हा विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा आणि सर्जा-राजाचा अर्थात शेतकऱ्याला जीव लावणाऱ्या बैलजोडींचा आहे, अशा प्रतिक्रिया बैलगाडा प्रेमींमधून उमटू लागल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यत बंदीबाबत (दि. १६ ) रोजी अंतिम सुनावणी झाली. न्यायमूर्ती खानविलकर यांच्यासमोर ही सुनावणी झाली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ सीनियर कौन्सिल ॲड. मुकुल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. शर्यत बंदीला समर्थन करणाऱ्या पक्षाकडून ॲड. अंतुरकर यांनी युक्तिवाद केला, अशी माहिती अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटनेचे राधाकृष्ण टाकळीकर यांनी दिली.
दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यमान नगरसेविका आश्विनी जाधव यांनी या निकालाचे स्वागत करीत जाधव वाडी मधील रामायण मैदान येथे बैलगाडा घाटाची दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधितांना देत प्रतिक्रिया दिल्या कि,आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या परवानगी नंतर आज मी एक बैलगाडा मालकाची सुन म्हणून प्रभागात रामायण मैदानाजवळील बैलगाडा घाटाची दुरुस्ती चालु केली व लवकरच या घाटात पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याची असलेली बैलगाडा शर्यत या ठिकाणी होणार . विशेष म्हणजे काल मी आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्यासोबत सुप्रीम कोर्टात सुनावणी वेळी उपस्थिती लावली. ही शर्यत चालु करण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे खासदार अमोल कोल्हे, मा. खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील व आमदार महेशदादा लांडगे यांचे सर्व बैलगाडा मालकांच्या वतीने आभार. असे आभार व्यक्त करीत आनंद व्यक्त केला.