1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित थ्रीडी मल्टिमीडिया लेझर चित्रफितीचे लोकार्पण
शबनम न्यूज : पुणे (दि.१७ डिसेंबर) :-
भारत-पाकिस्तानातील 1971 च्या युद्धावर आधारित थ्रीडी मल्टिमीडिया लेझर चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात येणारा सैनिकांच्या शौर्याचा इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरेल, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयास 50 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित थ्रीडी मल्टिमीडिया लेझर चित्रफितीचे लोकार्पण गुरुवारी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सोनल पटेल, एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त), ब्रिगेडियर अजित आपटे (निवृत्त), ब्रिगेडियर प्रकाश घोगले (निवृत्त), कर्नल संभाजी पाटील (निवृत्त), कर्नल पी. के. बत्रा (निवृत्त), कर्नल सदानंद साळुंखे (निवृत्त), कर्नल सुहास नेने (निवृत्त) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पुणे महापालिका काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून व पुणे महापालिकेच्या सहयोगातून साकारलेल्या या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यास राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उपमहापौर सुनीता वाडेकर, महापालिका विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, माजी आमदार उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार दिप्ती चवधरी, अ. भा. काँग्रेसच्या सचिव सोनल पटेल, राज्य महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सवालाखे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, सरहद्द संस्थेचे संस्थापक संजय नहार, राजकीय विश्लेषक तेहसीन पूनावाला, तसेच एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त), ब्रिगेडियर अजित आपटे (निवृत्त), ब्रिगेडियर प्रकाश घोगले (निवृत्त), कर्नल संभाजी पाटील (निवृत्त), कर्नल पी. के. बत्रा (निवृत्त), कर्नल सदानंद साळुंखे (निवृत्त), कर्नल सुहास नेने (निवृत्त) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवदर्शन परिसरातील कै. वसंतराव बागुल उद्यानात झालेल्या या कार्यक्रमास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
प्रारंभी देशाचे रक्षण करताना शहीद झालेले जवान आणि नुकतेच अपघातात निधन पावलेले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत व त्यांच्या सोबतच्या जवानांना श्रद्धांजली व मानवंदना अर्पित करण्यात आली. तसेच 1971 च्या भारत-पाक युद्धाच्या विजयाचे शिल्पकार पंतप्रधान इंदिरा गांधी, तेव्हाचे जनरल सॅम माणेकशॉ यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यानंतर या कार्यक्रमाच्या कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर बटण दाबून थ्रीडी मल्टीमीडिया लेझर चित्रफितीचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले.
यावेळी एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त), ब्रिगेडियर अजित आपटे (निवृत्त), ब्रिगेडियर प्रकाश घोगले (निवृत्त), कर्नल संभाजी पाटील (निवृत्त), कर्नल सदानंद साळुंके (निवृत्त), कर्नल बी. पी. पात्रा (निवृत्त) आदींचा विशेष सत्कार करण्यात आला.
वीस मिनिटांची ही चित्रफीत दाखविली गेल्यानंतर पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. 1971 चे युद्ध त्यावेळी टीव्ही नसल्याने आपण बघू शकलो नाही. तरुण पिढीला याबद्दल खूपच अल्प माहिती आहे. त्यामुळेच आपल्या देशाचा इतिहास व संरक्षण दलाचे रोमहर्षक विजय याची माहिती या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न केला आहे, असे सांगून 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील विजय व बांगलादेशची निर्मिती याचे हे देशातील पहिले आगळे वेगळे स्मारकच तयार झाले आहे, असे ते म्हणाले. ही चित्रफीत पुणे महापालिकेतर्फे कै. वसंतराव बागुल उद्यानात रोज सायंकाळी दाखवली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
याप्रसंगी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, 1971 च्या विजयाला आज पंन्नास वर्षे पूर्ण होत आहेत, यामुळे संपूर्ण देशात आज विजयोत्सव साजरा केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज पुणे महापालिकेकडून अंगावर शहारे आणणारा हा कार्यक्रम आज घेतला.
1965 साली पहिल्यांदा आपण राष्ट्र म्हणून लढलो. या युद्धात भारताला विजय मिळाला, मात्र 1971 चा विजय हा आपला पहिला मोठा निर्नायक विजय होता. हा विजय भारतातील सर्वच घटकाचा होता. या विजयानंतर भारताचे व इंदिरा गांधी यांचे जगात महत्व वाढले. या युद्धाने ’रॅ’ या परकीय गुप्तहेर संस्थेचा जन्म झाला. चौदा दिवसात मिळवलेला हा विजय देशातील तिनही दलाची भूमीका व नेतृत्वाचा महत्वाची होती.
या विजयानिमित्त आबा बागुल यांनी दहा दिवस विविध उपक्रम व नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेतले. यासाठी आबांचे कौतुक करणे गरजेचे आहे. सर्व पक्षनेते व अधिकार्यांना सोबत घेवून आबांनी हा आगळा वेगळा कार्यक्रम घेतला.
या कार्यक्रमामुळे तरुणांमध्ये राष्ट्र प्रमाची भावना निर्माण होईल. सैन्यात जाण्याची प्रेरणा मिळेल, यात शंका नाही, असेही चव्हाण म्हणाले.
याप्रसंगी बाळासाहेब थोरात म्हणाले की, इतिहास जिवंत करण्याचे काम या पाण्यावरील थ्रीडी शोच्या माध्यमातून झाले आहे. शहीद जवानांमुळे आपण सुखद जीवन जगत आहोत. या शूरवीरांना अभिवादन करणारा आजचा दिवस आहे. इंदिरा गांधी यांचे नेतृत्व वाखाणण्याजोगे आहे. हा इतिहास नव्या पिढीसमोर येणे गरजेचे आहे. ते काम आज आबा बागुल महापालिकेच्या माध्यमातून करत आहेत.
उल्हास पवार याप्रसंगी म्हणाले की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संसदेत निर्णायक लढ्याची घोषणा केली, आणि पाकिस्तानच्या सैन्याने शरणागती पत्कारली. त्यावेळी भारतीय सैन्याने दाखवलेले शौर्य व कामगिरी उत्तुंग होती. प्रत्यक्ष त्या लढ्यात भाग घेतलेले शूरवीर आज आपल्यासोबत आहेत, हे आपले भाग्य आहे. लढाईतील चित्र आज या शोच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे. युद्ध आले की आपण सैन्याचे कौतुक करतो, आणि इतर वेळी आपण त्यांना विसरतो, हे दुदैव आहे.
सत्काराला उत्तर देताना एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, 1971 च्या युद्धावेळी सबंध देश एकजूट होऊन आमच्या पाठीमागे उभा होता. देशातील नागरिकांनी दिलेले प्रोत्साहन आम्हाला बळ देते. यशवंतराव चव्हाण यांनी उत्तम समन्वय घडवून आणला. तीनही दलांत समन्वय होता, या समन्वयामुळे 1971 चे युद्ध आपण जिंकले. सैन्यात केवळ भारतीय ही एकच जात, पंथ व धर्म असतो.
सत्काराला उत्तर देताना ब्रिगेडियर प्रकाश घोगले (निवृत्त) म्हणाले की, आम्ही 42 तास लढलो, आम्ही 23 ते 25 नोव्हेंबर दरम्यान लढलो. या युद्धाच माझ्या टिममधील 38 जवान शहीद झाले. आम्ही पाकिस्तानचा एक अधिकारी आणि 100 जवान मारले.
या चित्रफितीची निर्मिती मोरेश्वर इलेक्ट्रिकल्स आणि गार्डियन मीडिया अँड एन्टरटेनमेंट यांनी केली असून, याचे निर्माते संजय दाबके यांच्यासह 40 तंत्रज्ञांनी सुमारे तीन ते चार महिने प्रयत्नपूर्वक ही चित्रफीत पुणे महापालिकेकरिता तयार केली आहे.