नियम पाळले गेले नाहीत तर लॉकडाऊन,अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील
शबनम न्युज : मुंबई (दि.३१ डिसेंबर) :- राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनच्या शक्यतेबाबत राज्य सरकारमधील मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सूचक संकेत दिले आहेत. राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनची स्थिती निर्माण होत आहे. मात्र लॉकडाऊनबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. याबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती विस्फोटक आहे. रुग्णवाढीचा आलेख वेगाने वाढत आहे. रुग्णदुप्पटीचा वेग एका दिवसावर आला आहे. रुग्णवाढीचा झपाटा पाहता जर आपण वेळीच निर्बंध घातले नाहीत तर राज्यात जानेवारी आणि एप्रिलमध्ये विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल. तसेच ज्या वेगाने हा आजार पसरतोय ते पाहता आता नियम पाळण्याची जबाबदारी जनतेवर आहे. जर नियम पाळले गेले नाहीत तर लॉकडाऊनला पर्याय उरणार नाही. त्यामुळे निमय पाळायचेत की पाळू नये, हे लोकांनी ठरवावं. लोकल काही काळापूर्वीच सुरू केल्यात आणि रुग्णवाढ झाली. आता तिसरी लाट आली आहे. आता पुन्हा एकदा लोकल आणि शाळांबाबत निर्णय घेण्यात येईल तो सगळ्यांचा विचार करूनच. लॉकडाऊनची स्थिती आता येत आहे ते कधी करायचं याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील.
कोरोना नियमांची पायमल्ली केल्यास कठोर कारवाई
राज्यात कोरोना तसेच कोरोनाचे नवे रुप अर्थात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे खबरदारी म्हणून सभा, समारंभ, तसेच सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नववर्ष आगमनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांत पार्टी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारादेखील राज्य सरकार तसेच प्रशासनाने दिलाय. असे असतानादेखील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. याच कारणामुळे वडेट्टीवार यांनी कोरोनाची तिसरी लाट आल्याचे वक्तव्य केले. तसेच लॉकडाऊनची वेळ आलीच तर ट्रेन, लोकल आणि इतर सुविधांवर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारादेखील त्यांनी दिला.