शबनम न्युज : मुंबई (दि.३१ डिसेंबर) :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटले आहे कि, नववर्ष २०२२ च्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष सर्वांना विकासाच्या नव्या संधी उपलब्ध करुन देणारे ठरेल. प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून महाराष्ट्राला कोरोना मुक्ती व सर्वांगीण प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी दृढसंकल्प होऊया.
मावळतं 2021 वर्ष अनेक संकटांना, आव्हानांना घेऊन आलं. मात्र, महाराष्ट्रवासियांची एकजूट आणि निर्धाराच्या बळावर आपण या आव्हानांचा यशस्वी मुकाबला केला. महाराष्ट्राची ही एकजूट यापुढेही कायम ठेवायची आहे. राज्य आणि देशासमोर ओमायक्रॉनचा धोका आणि कोरोनारुग्णांची वाढती संख्या हे नवीन आव्हान नववर्षाच्या सुरुवातीलाच उभं राहिलं आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचं आणि आदर्श कोरोना आचारसंहितेचे पालन करून आपण या संकटावर लवकरच विजय मिळवू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
कृषी, उद्योग व्यापार, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच देशात अव्वल राहिला आहे. महाराष्ट्राचं हे अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा दृढसंकल्प होऊया, असं सांगतानाच नववर्षाचे स्वागत उत्साहाने मात्र आरोग्यभान राखत संयमाने करा, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.