शबनम न्यूज : लोणावळा (दि.१७ जानेवारी) :- ‘सुवर्ण महोत्सवी भारत देश कसा असावा?’ या विषयावर पंतप्रधान कार्यालयाने प्रतिक्रिया व मत घेण्यासाठी देशभरातील शाळा व महाविदयालयातील मुलामुलींसाठी पोस्टकार्डवर विचार मांडण्याचे आवाहन केले होते. त्यामध्ये लोणावळ्यातील गौरी गायकवाड या मुलीच्या पोस्टकार्डची ७५ लाख कार्डमधून सवौत्तम पत्र म्हणून निवड झाली आहे.
लोणावळ्यातील व्ही.पी. हायस्कूल व ज्यु.काॅलेजमध्ये गौरी इयत्ता बारावी सायन्समध्ये शिकत आहे. तिच्या वयाच्या व बुध्दीच्या मानाने तिने व्यक्त केलेले विचार प्रभावी ठरले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाचनासाठी या पत्राची निवड झाली आहे. गौरी गायकवाडच्या या यशाबद्दल नुकताच लोणावळा पोस्ट आॅफिस व व्ही.पी.हायस्कुलच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.
दिड महिन्यांपूर्वी लोणावळा पोस्ट आॅफिसच्या वतीने सर्व शाळा व महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड वाटप करण्यात आले होते. ‘सुवर्ण महोत्सवी भारत देश कसा असावा?’ या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले मत लिहून ते पोस्टकार्ड शाळेत जमा करायचे होते. गौरी गायकवाड हिने देखील त्या पोस्टकार्डवर आपले विचार व्यक्त करून काॅलेजमध्ये ते जमा केले. जमा झालेली सर्व कार्डे काॅलेजने पोस्ट आॅफिसकडे पाठवून दिली होती.
दरम्यान गुरूवारी १३ जानेवारीला पंतप्रधान कार्यालयाकडून लोणावळा पोस्ट आॅफिसला कळविण्यात आले की, तुमच्या भागातील गौरी गायकवाडच्या पत्राची निवड करण्यात आली आहे.’
पोस्ट आॅफिसमध्ये ही वार्ता सगळयांना समजताच सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. लगेचच गौरीला व तिच्या शाळेला कळविण्यात आले.एक छोटेखानी सत्कार त्यानंतर आयोजित करण्यात आला. गौरी तसेच तिचे वडील विशाल गायकवाड हे आनंदाने न्हाऊन निघाले.
गौरीने नेमके काय विचार व्यक्त केले होते ते आम्ही वाचकांसाठी देत आहोत .
माझ्या मते भारत देश २०४७ साली असा असावा की,जिथे स्त्रियांना स्वातंत्र्य असावे, रात्री-अपरात्री रस्त्यावर त्या बिनधास्त चालाव्यात. तसेच रंग,जात, लिंग, प्रतिष्ठा याविषयी कोणामध्ये भेद नसावा.तसेच श्रीमंत वा गरीब असा फरक नसावा.धर्मनिरपेक्षता नांदावी.समानता, समृध्दता व शांतता या एकत्र असाव्यात.माझा भारत देश कोहिनूर हि-या प्रमाणे सतत चमकत रहावा.”