शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०२ फेब्रुवारी) :- मंगळवारी केंद्रिय अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला. केंद्रातील मोदी सरकारचा अर्थसंकल्प फसवा आहे. त्यांच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी काहीच दिसत नाही. अर्थमंत्री आणि पंतप्रधान मोदींनी पगारदार आणि मध्यमवर्गीयांसाठी कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. त्यांची घोर निराशा केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची अवस्था वाईट आहे. महागाईने सर्व वर्ग बेजार आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी दिली आहे.
तसेच पुढे म्हणाले कि, कोरोना संकटाने त्रस्त असल्यामुळे गरीब, नोकरदार, मध्यमवर्गीय, शेतकऱ्यांचे खिसे रिकामे आहेत. परंतु, त्यांना काहीच मिळालेले नाही. तरुणाचा अपेक्षाभंग झाला आहे. लघु उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ठोस कृती मोदी सरकारची नाही. करदात्यांना दिलासा देण्यासाठी कररचनेत काही बदल होतील आणि सवलतीची अपेक्षा होती. मात्र, कररचनेत कोणतेही बदल न करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतल्याने सामान्य करदात्यांची मोठी निराशा झाली आहे. देशाला अधोगतीकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे.