शबनम न्यूज : पुणे (दि.०३ फेब्रुवारी) :- कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच इयत्ता दहावी आणि बारावीची ऑफलाईन परीक्षा होणार आहे. इयत्ता 10वीची परीक्षा यंदा 15 मार्चपासून ते इयत्ता 12वीची परीक्षा येत्या 4 मार्चपासून घेण्यात येणार आहे. यंदा पहिल्यांदाच दहावी आणि बारावीच्या परीक्षा 15 दिवस उशिराने घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास वेळ मिळावा आणि शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ मिळावा म्हणून बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. या शिवाय दोन्ही परीक्षा विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेतच होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जाऊन परीक्षा देण्याची वेळ येणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 15 मिनिटे ते अर्धा तासाची वेळही वाढवून देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत इयत्ता 10 वी आणि 12वीच्या परीक्षांची घोषणा केली. तसेच इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाईन होणार नसून ऑफलाईनच होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.
कोरोनाचे नियम पाळून परीक्षा होतील, असेही शिक्षण मंडळाने म्हटले आहे.
बारावीची परीक्षा दरवर्षी 20 फेब्रुवारी रोजी होते. यंदा ही परीक्षा 4 मार्चपासून सुरू होणार आहे. बारावीची परीक्षा 30 एप्रिलपर्यंत चालणार आहे. तसेच इयत्ता दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होत असते. मात्र, यंदा दहावीची परीक्षा 15 मार्चपासून सुरू होणार असून 4 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा यंदा 15 दिवस उशिराने सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास वेळ मिळावा आणि शिक्षकांनाही अध्यापनासाठी वेळ मिळावा म्हणून यंदा हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत परीक्षेसाठी बारावीच्या १४ लाख ७२ हजार ५६२ विद्यार्थ्यांची तर दहावीच्या १६ लाख २५ हजार ३११ विद्यार्थ्यांची नोंदणी मंडळाकडे आहे.असं शरद गोसावी यांनी सांगितलं.
प्रॅक्टिकल 40 टक्के अभ्यासक्रमावरच
यंदा बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चवर असणार आहे. प्रॅक्टिकलच्या अभ्यासक्रमाच्या 40 टक्के अभ्यासक्रमावर प्रॅक्टिकलची परीक्षा होणार आहे. तसे निकष तज्ज्ञांना विचारून करण्यात आल्याचं गोसावी यांनी सांगितलं. दहावीचे अंतर्गत मूल्यमापण किंवा प्रॅक्टिकल 40 टक्के अभ्यासक्रमावरच असेल.
बाहेरचा परीक्षक नाही
प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 40 टक्के अभ्यासक्रम केला तरी अंतर्गत परीक्षक आणि बहिस्थ: परीक्षक त्याच शाळेतील ठेवण्यात येणार आहेत. सुपरवायझर आला तर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर दडपण येऊ शकते. म्हणून बहिस्थ: परीक्षक नेमण्यात येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
75 टक्के अभ्यासक्रमावर लेखी परीक्षा
यंदा 75 टक्के अभ्यासक्रमावर इयत्ता दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा होणार आहे. 100 टक्के अभ्यासक्रमावर लेखी परीक्षा होणार नाही. म्हणजे यंदा इयत्ता दहावी आणि बारावीचा 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे, असं शरद गोसावी यांनी सांगितलं.
वेळ वाढवून देण्याचा मोठा निर्णय
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी अधिकचा वेळ वाढवून दिला आहे. या दोन्ही परीक्षेच्या 40 ते 60 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं अधिक वेळ देण्यात येणार आहे. तसेच 70, 80 ते 100 गुणांसाठीच्या परीक्षेसाठी अर्धा तास देण्यात येणार आहे.
पेपर किती वाजता सुरू होणार
इयत्ता दहावी आणि बारावीचे सकाळच्या सत्रातील पेपर दरवर्षी सकाळी 11 वाजता सुरू होतात. यंदा हे पेपर सकाळी 10 वाजून 30 मिनिटाने सुरू करण्यात येणार आहेत. प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना 10 मिनिटे दिली जातात. ही दहा मिनिटे यंदाही दिली जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष 10 वाजून 20 मिनिटाने सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात 2 वाजून 50 मिनिटाने प्रश्नपत्रिका मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थी वाढीव वेळेनुसार परीक्षा देऊ शकणार आहेत. कोरोनामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत होते. प्रत्यक्ष शाळेत हजर राहू न शकल्याने गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सोयीसाठी ही वेळ वाढवून दिली आहे.
विशेष सवलत
लेखी परीक्षा सुरु असताना एखाद्या विद्यार्थ्याला काही वैद्यकीय त्रास झाला तर प्रत्येक केंद्रात विशेष कक्ष (वर्ग) असणार आहे.त्यामध्ये विद्यार्थ्याला सोयीनुसार परीक्षा देता येणार.यासाठी शासकीय आरोग्य केंद्रातील वैद्यकीय तज्ज्ञ विद्यार्थ्यांची आरोग्याची काळजी घेतील.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्यानंतर त्याविरोधात दहावी आणि बारावीचे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाने परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२ वी आणि इयत्ता १० वीच्या परीक्षा आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी काही विशिष्ट उपाय योजना जाहीर केल्या आहेत. त्यातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे @msbshse @MahaDGIPR pic.twitter.com/B8L4fDMV4z
Advertisement— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) February 3, 2022